सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत लाभासाठी ठरवलेल्या नियम आणि अटींच्या निकषांत अडकल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ३ हजार ९९६ शेतकरी अपात्र ठरले आहेत. प्रामुख्याने काही मोठे शेतकरी, सरकारी नोकरदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी साधारण यांचा या अपात्र यादीत समावेश असल्याचे सांगण्यात येते, आता यासंबंधीचा सर्वंकष अहवाल शासनाला सहकारी संस्थांच्या जिल्हा उपनिबंधकांनी पाठवला आहे.
या योजनेसाठी अपात्र ठरलेल्या सर्वच्या सर्व तीन हजार ९९६ व्यक्तींचे आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्मतारीख, जन्म ठिकाणासह इतर माहिती शासनाला सादर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एक हजार ८८४ संस्थांमधील तीन हजार ९९६ अपात्र व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यातील ३४ नागरी सहकारी बॅंकांतील १०९ पदाधिकारी व अधिकारी, ९८५ पतसंस्थांतील दोन हजार ६२७ पदाधिकारी, अधिकारी, आठ सूतगिरण्यांमधील १५ पदाधिकारी व कर्मचारी, नऊ बाजार समित्यांमधील २७ पदाधिकारी व अधिकारी, जिल्ह्यातील १४ सहकारी साखर कारखान्यांमधील ३१ पदाधिकारी व अधिकारी, चार सहकारी दूध संघातील १२ अधिकारी व पदाधिकारी, ८२२ मजूर संस्थांमधील ७८२ पदाधिकारी यांना शेतकरी कर्जमाफीच्या योजनेतून वगळण्यात आले.
कर्जमाफीच्या योजनेतील माहिती पूर्वी जेएसएन प्रकारात सरकारला पाठविण्यात आली आहे, ही माहिती एक्सेल प्रकारात पुन्हा पाठविण्याची सूचना राज्य सरकारकडून त्या त्या जिल्ह्यांना करण्यात आली. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातून ही माहिती शासनाला पाठविण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी दिली.