सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील ३१ हजार ९२५ शेतकऱ्यांसाठी १७० कोटी ३३ लाख २२ हजार ९२४ रुपये सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडे वर्ग करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या या याद्यांतदेखील त्रुटी असल्याने बॅंकेच्या वतीने शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणी करूनच रक्कम जमा केली जात आहे. सोमवारी (ता. २७) रात्री नऊपर्यंत जिल्ह्यातील २८०० शेतकऱ्यांच्या खात्यावर १६ कोटी ८४ लाख रुपये जमा करून या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी कर्जमाफी योजनेत राज्यातील सहकारी व राष्ट्रीयीकृत बॅंका, सहकार विभाग यांचा सातत्याने आढावा घेतल्याने व प्रशासकीय यंत्रणा गतिमान केल्याने कर्जमाफी योजनेला आता गती येऊ लागली आहे. कर्जमाफी योजनेचा आढावा घेण्यासाठी दर तीन दिवसांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठका आयोजित केल्या जात आहेत.
राज्य सरकारने जिल्हा बॅंकेला दिलेली रक्कम फक्त विविध विकास सेवा सहकारी संस्थेला न देता थेट शेतकऱ्यांना मिळावी. रक्कम मिळाल्यानंतर त्यांची नोंद खतावणीला व्हावी, यासाठी जिल्हा बॅंक व राज्य सरकारच्या वतीने कटाक्षाने लक्ष दिले जात आहे.
कर्जमाफीच्या यादीत आलेल्या ३१ हजार शेतकऱ्यांची माहिती पडताळण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, सोमवारी दुपारपर्यंत ३१ हजार शेतकऱ्यांपैकी २१ हजार शेतकऱ्यांची माहिती पडताळून झाली आहे.
उर्वरित शेतकऱ्यांची माहिती येत्या एक ते दोन दिवसांत पूर्ण होणार असून, कर्जमाफीची रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी येत्या एक ते दोन दिवसांत अधिक वेग येण्याची शक्यता आहे. कर्जमाफी योजनेतील तालुकानिहाय लाभार्थी ः अक्कलकोट : ३४३६, बार्शी : ४७२६, करमाळा : ३५३४, माढा : २६८४, माळशिरस : २४८१, मंगळवेढा : ३४६४, मोहोळ : २७२२, उत्तर सोलापूर : ११३५, पंढरपूर : ३४६२, सांगोला : १५६३, दक्षिण सोलापूर : २७१८, एकूण : ३१ हजार ९२५.