वर्धा जिल्ह्यात कर्जमाफीचे केवळ कागदी घोडे

वर्धा जिल्ह्यात कर्जमाफीचे केवळ कागदी घोडे
वर्धा जिल्ह्यात कर्जमाफीचे केवळ कागदी घोडे
वर्धा : शासनाने मोठा गाजावाजा करून १० जुलै रोजी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. त्याला आता चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र, आजपर्यंत केवळ कागदी घोडे नाचविल्याने जिल्ह्यात एकाही शेतकऱ्याला प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे सरकारविरुद्ध शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.
पीक कर्जमाफीची प्रक्रिया ही सुरवातीपासूनच अतिशय गुंतागुंतीची राहिल्यामुळे त्यामध्ये कोणते निकष ठेवावेत, यासाठी शासनाने अनेकवेळा फेरबदल केले. शेतकऱ्यांना देण्यात आलेली पीक कर्जमाफी ही आजपर्यंत सगळ्यात मोठी कर्जमाफी असल्याचा दावाही शासनाकडून करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात वर्धा जिल्ह्यातील एकाही लाभार्थ्याच्या बॅंक खात्यात कर्जाची रक्कम जमा झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
मागील कित्येक वर्षांपासून विविध संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीतून काही प्रमाणात का होईना दिलासा मिळेल, असे वाटत असताना त्यांची घोर निराशाच झाली आहे. विदर्भात गत सहा महिन्यांत ६९० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटावळे. असे असताना याबाबत शासनाला काहीच गांभीर्य कसे नाही, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. आजपर्यंत वारंवार मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पंधरा दिवसांत पैसे जमा करण्यात येतील, असे आश्‍वासन दिले होते, याबाबत बॅंकांना मौखिक आदेशही दिले; परंतु शासनाने प्रत्यक्ष बॅंकांकडे रक्कमच वर्ग केली नसल्याने बॅंकांकडून आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. परिणामी आजपर्यंत एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आलेली नाही.
जिल्ह्यात विविध बॅंकांचे कर्ज असलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांची १ लाख १० हजार एवढी संख्या असून, त्यासाठी ९०० कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे, तसा प्रस्तावही जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे पाठविण्यात आला. मात्र, यापैकी किती शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र व अपात्र ठरले आहेत, याबाबत शेतकऱ्यांची कोणत्याच प्रकारची माहिती अग्रणी बॅंकेकडे प्राप्त झालेली नाही. यावरून कर्जमाफीची घोषणा होऊन चार महिन्यांचा कालावधी लोटला असताना, पात्र शेतकऱ्यांच्या यादीचा घोळच अद्याप मिटला नसल्याचे चित्र आहे. 
शासनाकडून शेतकरी कर्जमाफीची दमडीही बॅंकेत जमा न करता केवळ पीककर्ज माफ करण्याचे मौखिक आदेश देऊन बॅंकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु रिझर्व्ह बॅंकेकडून बॅंकांना कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी सूचनाच नसल्याने कर्जमाफीची प्रक्रिया अद्याप थंडबस्त्यातच असल्याचे दिसते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com