हिंगोली : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने सरसकट कर्जमाफी केली आहे, असे प्रतिपादन हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी मिळालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांपैकी २५ शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमाफी प्रमाणपत्राचे वाटप श्री. कांबळे यांच्या हस्ते बुधवारी (ता. १८) करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, नगर परिषदेचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर, आमदार तान्हाजी मुटकुळे, अप्पर जिल्हाधिकारी जी. जी. मिनियार, निवासी उपजिल्हाधिकारी उद्धव घुगे, उपविभागीय अधिकारी प्रशांत खांडेकर, तहसीलदार गजानन शिंदे, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक सुधीर मेत्रेवार उपस्थित होते.
हिंगोली जिल्ह्यात कर्जमाफी योजनेअंतर्गत १ लाख ९ हजार ३८५ ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. कर्जमाफी योजना व परतफेड सवलत योजनेअंतर्गत पात्र २५ शेतकरी कुटुंबांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार केला.कार्यक्रमास विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे शेतकरी सभासद यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.