अर्जासाठी पैसे उकळणाऱ्यांचे परवाने रद्द करणार
अर्जासाठी पैसे उकळणाऱ्यांचे परवाने रद्द करणार

कर्जमाफी अर्जासाठी पैसे उकळणाऱ्यांवर कारवाई

शेतकरीकर्जमाफीत स्वतःचेही उखळ पांढरे करून घेण्याचे प्रयत्न काही केंद्रचालकांनी चालवले आहेत. अशा केंद्रचालकांचे परवाने रद्द करण्यात येणार आहेत

मुंबई : शेतकरी कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरून घेण्यासाठी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या सेतू, महा-ई-सेवा, नागरिक सुविधा केंद्र, संग्राम आदी केंद्रचालकांविरोधात सहकार खात्याने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ऑनलाइन अर्ज भरून घेण्यापोटी राज्य सरकारकडून संबंधित केंद्रचालकांना प्रति अर्जामागे शंभर रुपये मोबदला देण्यात येणार आहे. तरीही शेतकऱ्यांच्या या कर्जमाफीत स्वतःचेही उखळ पांढरे करून घेण्याचे प्रयत्न काही केंद्रचालकांनी चालवले आहेत. अशा केंद्रचालकांचे परवाने रद्द करण्यात येणार आहेत. 

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले आहे. दीड लाखापुढील शेतकऱ्यांसाठी एकरकमी परतफेड योजनेचा लाभ दिला जाणार आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांसाठी २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे; तसेच या योजनेत कर्ज पुर्नगठीत झालेल्या शेतकऱ्यांनाही लाभ दिला जाणार आहे. राज्य सरकारच्या दाव्यानुसार राज्यात ९० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे; तर सुमारे ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. या शेतकऱ्यांना सुमारे ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाईल, असे सरकारने जाहीर केले आहे. 

या कर्जमाफीचे लाभ देण्यासाठी शेतकऱ्यांची माहिती ऑनलाइन अर्जाद्वारे घेतली जात आहे. ऑनलाइन अर्ज भरून घेण्यासाठी २६ हजार केंद्रांवर सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आपले सरकार सेवा केंद्र, नागरिक सुविधा केंद्र, संग्राम आणि काही ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचा समावेश आहे. अर्ज भरायला येणाऱ्या शेतकऱ्यांना ‘आधार’शी लिंक केले जात आहे. शेतकऱ्यासोबत त्यांची पत्नी आणि अठरा वर्षांखालील मुलांचेही अर्ज भरून घेतले जात आहेत. मात्र, हे ऑनलाइन अर्ज भरून घेण्यासाठी काही केंद्रचालक शेतकऱ्यांकडून पैसे उकळत असल्याच्या तक्रारी आहेत. पन्नास रुपयांपासून ते दोनशे रुपयांपर्यंत रक्कम उकळली जात आहे.     जिल्हा उपनिबंधकांना निर्देश ऑनलाइन अर्ज भरून घेण्याची ही प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी संपूर्णपणे मोफत असून या संदर्भात सहकार विभागाकडून वारंवार जनजागृती केली जात आहे. वास्तविक पाहता राज्य सरकारकडून संबंधित केंद्रचालकांना एका अर्जामागे शंभर रुपये मोबदला देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारण्याची आवश्यकता नाही. तरीही काही ठिकाणी आर्थिक पिळवणुकीच्या तक्रारी आहेत. याची गंभीर दखल सहकार खात्याने घेतली असून पैसे घेणाऱ्या केंद्रचालकांचे परवाने रद्द केले जाणार आहेत. कुणाचीही हयगय केली जाणार नाही, असे सहकार विभागातील उच्चपदस्थ सूत्रांकडून सांगण्यात आले. तसे निर्देश राज्यातील सर्व जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com