नाशिकला कर्जमाफी यादीतील घोळ वाढला

नाशिकला कर्जमाफी यादीतील घोळ वाढला
नाशिकला कर्जमाफी यादीतील घोळ वाढला

नाशिक  : दिवाळीचा मुहूर्त साधत राज्यभरातील शेतकऱ्यांना घाईगडबडीत कर्जमाफीची भेट देण्याचा घाट राज्य सरकारच्याच आता अंगलट आला आहे. घाईगडबडीत कर्जमाफीतील शेतकऱ्यांच्या यादीचा तिढा सुटण्याऐवजी अधिकच वाढला असून, नाशिकमध्ये एका दापंत्याला घाईगडबडीत दीड लाखापेक्षा जास्तीची कर्जमाफी देण्याचा प्रताप सरकारी यंत्रणानी केला आहे. जिल्हा बँकेला पाठविलेल्या यादीत एका शेतकरी दांपत्याला दीड लाखाऐवजी चक्क एक लाख ८९ हजार रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. त्यामुळे राज्य सरकारने नाशिक जिल्हा बँकेला पाठविलेल्या कर्जमाफीच्या यादीत मोठा घोळ असल्याने बँकेने ८७९ शेतकऱ्यांची यादी पुन्हा दुरुस्तीसाठी सरकारकडे पाठवली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा घोळ दोन महिन्यांपासून सुरू आहे. त्यातच दिवाळीचा मुहूर्त साधत राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. नाशिकमध्ये संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील ३० शेतकऱ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात कर्जमाफी देऊन सरकारी सोपस्कार पार पडले गेले. उर्वरित शेतकऱ्यांना पाच सहा दिवसांत कर्जमाफी मिळेल, असा दावा या वेळी मंत्रिमहोदयांनी केला होता. मात्र आता दहा बारा दिवस उलटून गेलेत तरीही शेतकऱ्यांच्या हाती अद्याप काहीच पोचले नाही. घाईगडबडीत सरकारने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी जिल्हा बँकेला ८७९ पात्र लाभार्थ्यांची यादी पाठविण्यात आली. मात्र त्या यादीत भरमसाट चुका असल्याचे जिल्हा बँकेच्या निदर्शनास आले. एकाच कुटुंबातील पती-पत्नी दोघांना कर्जमाफी देऊन त्या कर्जाची रक्कम १ लाख ८९ हजार रुपयांपर्यंत जात असल्याने सरकारी नियमांची पायमल्ली होतेय. तरतूद दीड लाखाची असताना दीड लाखापेक्षा जादा कर्जमाफी दिल्याचे निदर्शनास येत असल्याने जिल्हा बँकेन ८७९ शेतकऱ्यांची यादी पुन्हा दुरुस्तीसाठी शासनाकडे पाठवली आहे. अवघे ८७९ शेतकरी नाशिक जिल्ह्यातून १ लाख ७४ हजार ५२५ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज सादर केलेत. त्यापैकी जिल्हा बँकेला ८७९ शेतकऱ्यांची पहिली यादी आणि ३ कोटी ७० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. मात्र यादीतील घोळ कायम असल्याने शेतकरी आजही कर्जमाफीपासून वंचित आहेत. त्यामुळे सरकारचा तोंडदेखलेपणा उघडकीस झाल्याचा आरोप होतोय. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी आणि सरकारची प्रतिमा उंचाविण्यासाठी सरकरने दिवाळीचा मुहूर्त निवडला खरा मात्र शेतकरी आजही कर्जमाफीपासून वंचित असल्याने बळिराजाची दिवाळी अंधारातच आहे.

२१ कोटींच्या नोटा रद्दीत दरम्यान, एकीकडे कर्जमाफीसाठी शेतकरी जिल्हा बँकेत फेऱ्या मारत असतानाच नोटाबंदीदरम्यान जिल्हा बँकेने जमा केलेले २१ कोटी रद्दीत गेले आहेत. रिझर्व्ह बँकेने ३४१ पैकी ३२० कोटींच्याच नोटा स्वीकारल्या असून उर्वरित २१ कोटींचा ताळमेळ लागत नसल्याने त्या नोटा घेण्यास नकार दिला आहे. जिल्हा बँकेने या नोटांसाठी केलेले सगळे प्रयत्न फोल ठरले आहेत. त्यामुळे या नोटा आता रद्दीत टाकण्याशिवाय दुसरा पर्याय बँकेसमोर उरलेला नाही, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com