कांदा दर वाढले, तेव्हा भाजपने विरोध केला : शरद पवार

कांदा दर वाढले, तेव्हा भाजपने विरोध केला : शरद पवार
कांदा दर वाढले, तेव्हा भाजपने विरोध केला : शरद पवार

नाशिक   ः कृषिमंत्री असताना मी निर्यातबंदी उठवली. त्या वेळी कांद्याचे भाव वाढले. विरोधात असलेल्या भाजपने संसद बंद करण्याचा घाट घातला होता. कांद्याचे भाव वाढले असताना विरोध करणारे हे सरकार कसे काय कांदा उत्पादकांना आधार देणार, गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक घोषणा केल्या. देशातील शेतीबाबत आणि शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेही काम केले नाही. अनेक घोषणा केल्या असताना अंमलबजावणी केल्याचे दाखवा, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.  

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचारार्थ निफाड येथे बुधवारी (ता. २४) आयोजित प्रचारसभेत श्री. पवार बोलत होते. या वेळी आरपीआयचे (एकतावादी) नानासाहेब इंदिसे, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, राजाराम पानगव्हाणे, माजी आमदार दिलीप बनकर, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, चांगदेवराव होळकर, माणिकराव बोरस्ते, राजेंद्र डोखळे उपस्थित होते. 

या वेळी श्री. पवार म्हणाले, की देशात शेतीबाबत जे काम केले ते पंतप्रधानांनी सांगावे. २०१७ ते १९ या काळात ११,९९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतीबाबत धोरणे नसल्याने पीक उत्पादन घसरले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शेतीबाबत कोणतेही तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग व संबंधित कारखानदारी उभी केली नाही. शेती अडचणीत आल्याने देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आहे. 

कृषिमंत्री असताना मी निर्यातबंदी उठवली. त्या वेळी कांद्याचे भाव वाढले. विरोधात असलेल्या भाजपने संसद बंद करण्याचा घाट घातला होता. कांद्याचे भाव वाढले असताना विरोध करणारे हे सरकार कसे काय कांदा उत्पादकांना आधार देणार, असा सवाल श्री. पवार यांनी या वेळी केला. या सरकारला शेतीबद्दल आस्था नाही. आज शेतमालाला भाव नाही. सरकारकडे धोरणांचा अभाव असल्याने संपन्न नाशिक जिल्ह्यातही आत्महत्या वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची बाजू मांडणारे सरकार स्थापन करण्यासाठी साथ द्या, मी अजून थकलो नसून मोदी सरकारला घालविल्याशिवाय शांत बसणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, नरेंद्र मोदी हे सामान्यांचे प्रतिनिधित्व करत नाही. शेतमालाच्या बाबतीत या सरकारने फसवले आहे. या चालू वर्षात नाशिक जिल्ह्यात २५ शेतकरी आत्महत्या झाल्या. हे या सरकारचे अपयश आहे.   ...तर कांद्याचे लिलाव का बंद केले? मोदी सरकारचे धोरण व्यापार वाढविणार, शेतकऱ्यांना व्यवस्था देणार व अर्थव्यवस्था वाढविणार असल्याचे सांगितले जाते, तर मग सभेच्या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून कांद्याचा लिलाव बंद करून बाजार समितीचे कामकाज व व्यवहार का थांबविले, असा सवाल शरद पवार यांनी या वेळी उपस्थित केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com