मराठवाड्यातील जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
परभणी ः सेंद्रिय घटकांचा कमी वापर तसेच रासायनिक खतांच्या असंतुलित वापरामुळे मराठवाड्यातील जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण गेल्या दहा वर्षांत कमी झाल्याचे आढळून आले आहे.
 
परिणामी जमिनीची सुपिकता कमी झाली असून, पिकांची उत्पादकता घटली आहे. मराठवाड्यातील शेतकरी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा अत्यंत कमी वापर करतात. त्यामुळे शेतीमालाची प्रत खालावते. परिणामी कमी बाजार मिळतो, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील मृदाविज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभागप्रमुख डाॅ. सय्यद ईस्माइल यांनी ‘अॅग्रोवन’शी बोलताना दिली.
 
डाॅ. सय्यद म्हणाले, की पिकांच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्यांच्या असंतुलित वापरामुळे गेल्या २० वर्षांत मराठवाड्यातील १२.८ टक्के जमीन नापिक झाली आहे. मराठवाड्यातील १७ ते १८ टक्के शेतजमीन खोल (भारी) आहे. ५७ टक्के जमीन मध्यम, तर उर्वरित जमीन उथळ (हलकी) आहे.
 
जमिनीमध्ये नत्र, स्फुरद, गंधक, जस्त, लोह, बोराॅन या सहा अन्नद्रव्यांची कमतरता आहे. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.७५ पेक्षा अधिक असल्यास पुरेसे असते; परंतु गेल्या दहा वर्षांत ते ०.५ पर्यंत कमी झाले आहे. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी झाल्यामुळे जमिनीची जलधारण क्षमता कमी झाली आहे.
 
पाण्याचा थोडा जरी ताण पडला तरी पिके सुकू लागतात. जिवाणूंची संख्या कमी झाल्यामुळे पिकांना पुरेशा प्रमाणात अन्नद्रव्ये मिळत नाहीत. जमिनीची सुपिकता कमी होण्यामागे अतिवृष्टीमुळे होणारी जमिनीची धूप, सेंद्रिय पदार्थांचा नगण्य वापर, रासायनिक खतांचा असंतुलित वापर, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा तसेच हिरवळीच्या खतांचा अल्प वापर आदी कारणे आहेत. जमिनीतून अन्नद्रव्यांचा उपसा वाढला; परंतु त्या प्रमाणात अन्नद्रव्ये टाकली जात नाहीत. त्यामुळे जमिनिची सुपिकता टिकून राहिली नाही. धूप टाळण्यासाठी जलसंधारणाचे विविध उपाय करावे लागतील. 
 
सेंद्रिय अन्नघटक वाढविणे गरजेचे
जमिनिची सुपिकता वाढविण्यासठी सेंद्रिय अन्नघटक वाढविणे गरजेचे आहे. सेंद्रिय अन्नघटकांचे प्रमाण वाढविण्यासाठी हिरवळीचे खत, पालापाचोळ्याचे खत, पिकांचे अवशेष, गांडुळ खत, जैविक खते, साखर कारखान्यांतील ऊस मळीचा वापर केल्यास सेंद्रिय घटकांचे प्रमाण वाढून उत्पादकता वाढेल.
 
४३ टक्के जमिनी चुनखडीयुक्त
मराठवाड्यातील सरासरी ४३ टक्के जमिनी चुनखडीयुक्त आहेत. नांदेड जिल्ह्यात चुनखडीयुक्त जमिनीचे प्रमाण सर्वाधिक ७७ टक्के आहे, असे डाॅ. सय्यद यांनी सांगितले.
सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रयोगशाळेत पृथ्थकरण करून घेऊन त्यानुसार कमी असलेल्या अन्नद्रव्य घटकांचा वापर करावा. मुख्य अन्नद्रव्यांएवढीच सूक्ष्म अन्नद्रव्येदेखील महत्त्वाची आहेत. जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी सेंद्रिय घटकांचे प्रमाण वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे.
- डाॅ. सय्यद ईस्माईल, विभागप्रमुख, मृदविज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र, ‘वनामकृवि’, परभणी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com