वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय हमीभावापेक्षा कमी दर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग, उडदाची मागील १५ दिवसांपासून सर्वच बाजार समित्यांमध्ये आवक वाढलेली आहे. परंतु एकाही ठिकाणी शासनाने जाहीर केलेला हमीभाव या शेतीमालांना मिळत नसल्याची वस्तुस्थिती असून शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. असे असतानाही अजूनपर्यंत हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्याची निश्‍चित तारीख जाहीर झालेली नाही. शेतकऱ्यांना पर्याय नसल्याने बाजार समित्यांमध्ये मुगाची ४ हजार ते ५२०० रुपये आणि उडिदाची ३८०० ते ४१०० रुपये दराने विक्री होते आहे. हमीभावापेक्षा मुगाला १७०० रुपये तर उडदाला १५०० रुपये कमी भाव मिळत आहे.  

या हंगामात अकोला, बुलडाणा, वाशीम या तीन जिल्ह्यांमध्ये मुगाची सुमारे ६० हजार तर उडदाची सुमारे ५८ हजार हेक्‍टरवर लागवड झाली होती. मुगाची हेक्‍टरी उत्पादकता ५ क्विंटल गृहीत धरली तर या जिल्ह्यांमध्ये ३ लाख क्विंटल आणि उडदाचे हेक्‍टरी चार क्विंटल उत्पादन गृहीत धरता सुमारे अडीच लाख क्विंटलपर्यंत उत्पादन अपेक्षित आहे.

सप्टेंबरच्या मध्यापासून मुगाची व त्यानंतर काहीच दिवसांनी उडदाची बाजारपेठांमध्ये आवक सुरू झाली. मोठ्या बाजार समित्यांमध्ये मुगाची सरासरी २०० ते ४०० क्विंटल आणि उडदाची १०० क्विंटलपर्यंत आवक झाली. अकोल्यात या महिन्यातील दहा दिवसांत चार हजार क्विंटल मूग विक्री झाला. मुगाला किमान ४२०० रुपये तर कमाल ५४०० रुपये दर मिळाला. जास्तीत जास्त दर हा सुद्धा हमीभावापेक्षा कमी आहे. या दोन्ही दरांमध्ये १५७५ रुपयांची तफावत आहे. विक्री झालेल्या सर्वच मुगाला हा जास्तीत जास्त दर मिळालेला नाही. या दहा दिवसांत विक्री झालेल्या मूग उत्पादकांना लाखोंचा फटका बसला. प्रत्येक बाजार समितीत अशाच प्रकारची स्थिती आहे.

हमीभावाने खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीची शासनाने गेल्या महिन्यात २५ सप्टेंबरला घोषणा केली. त्यानंतर आठवडाभर नोंदणी प्रक्रीया सुरू व्हायला वेळ लागला. वाशीम जिल्ह्यात तर या आठवड्यात नोंदणीला मुहूर्त मिळाला. आता मूग, उडदाची ही नोंदणी २४ ऑक्‍टोबरपर्यंत केली जाणार असल्याचे सांगितले जाते. सोयाबीनची नोंदणी तर बहुतांश केंद्रांनी ऑक्‍टोबरचा दुसरा आठवडा लोटला तरी सुरू केली नव्हती.

यावर्षी तीनही जिल्ह्यांत उद्दिष्टाच्या सरासरी ३० टक्केसुद्धा खरीप पीककर्ज वितरित झालेले नाही. शिवाय रब्बी हंगाम तोंडावर आलेला आहे. उत्पादनही अपेक्षित आलेले नाही. अशा पेचात शेतकरी अडकला असून तो पिकवलेला शेतीमाल मिळेल त्या भावात विकून मोकळा होत आहे. शेतकऱ्यांना हमीभाव खरेदी केंद्रे सुरू होण्याची प्रतीक्षा करायलाही वेळ नाही. या तीन जिल्ह्यांतील बाजार समित्यांमध्ये दररोज मिळून किमान दोन हजार क्विंटल मूगाची कमी दरात विक्री होत आहे. तर हजार क्विंटलपर्यंत उडीद विकला जात आहे. दोन्ही शेतमाल उत्पादकांचे दररोज लाखोंचे नुकसान सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com