कोल्हापूर : येथील बाजार समितीत गेल्या दोन दिवसांपासून आंब्याची आवक वाढली आहे. पूर्वमोसमी पाऊस होऊन आंब्यांचे नुकसान होईल या शक्यतेने कोकणातील बागायतदार जादा प्रमाणात आंबा येथील बाजार समितीत पाठवत आहेत. दररोज चार ते पाच हजार पेट्यांची आवक बाजार समितीत होत आहे.
यंदा आंब्याची आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० टक्क्यांनी घटली आहे. यामुळे मे महिना उजाडला तरी आंब्यांच्या आवकेत फारशी वाढ होत नव्हती. दराचा अंदाज घेऊन थोड्या थोड्या प्रमाणात आंब्यांची आवक होत होती; परंतु आठ दिवसांपूर्वी कोकणासह अन्य ठिकाणी ढगाळ हवामान व पावसाची शक्यता निर्माण झाल्याने बागायतदारांनी झाडावरील आंबे उतरवून तातडीने ते बाजारपेठेत पाठविण्यास प्राधान्य दिले.
एखादा जोराचा पाऊस झाल्यास सर्वच आंब्याचे नुकसान होऊ नये यासाठी बागायतदारांनी आंबे कोल्हापूरच्या बाजारपेठेत पाठविण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे बाजारपेठेत आंब्यांची आवक वाढल्याची माहिती फळ विभागाच्या सूत्रांनी दिली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांबरोबर बेळगाव, बेंगळूर येथूनही हापूस आंब्यांची जोरदार आवक सुरू झाल्याने आंब्याचे दर कमी झाले आहेत.
कोल्हापूर बाजार समितीत गुरुवारी (ता. १०) देवगड हापूस आंब्यास डझनास १०० ते ४०० रुपये, पायरीस १०० ते २५० रुपये, कर्नाटक हापूसला १०० ते २०० रुपये, तर कर्नाटक पायरीस ५० ते १५० रुपये दर मिळाला.