इंधनदरवाढीच्या आगडोंबानंतर खतांच्या किमती आवाक्‍याबाहेर
इंधनदरवाढीच्या आगडोंबानंतर खतांच्या किमती आवाक्‍याबाहेर

इंधनदरवाढीच्या आगडोंबानंतर खतांच्या किमती आवाक्‍याबाहेर

यंदा पुरेसा पाऊस नसल्याने खताची विक्री फारशी झालेली नाही. खरिपातीलच खतसाठा आमच्याकडे शिल्लक आहे. त्यात या वाढीव दराच्या खताची विक्री कशी होणार, हा प्रश्‍न आहे. - भीमराव कौंडुभरी, चेअरमन, सल्लागार समिती, महाराष्ट्र फर्टिलायझर डिलर्स असोसिएशन, पुणे

सोलापूर ः कमी पाऊसमानामुळे राज्याच्या अनेक भागांत दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. खरीप वाया गेला आहे, आता उरलेल्या दहा-पंधरा दिवसांत तरी पाऊस पडेल, याकडे डोळे लावून शेतकरी बसला आहे. त्यातच इंधनदरवाढीने यांत्रिकीकरणाच्या शेतीला आधीच फटका बसला असताना, खताच्या किमती वाढवून सरकारने आणखी एक मोठा दणका शेतकऱ्यांना दिला आहे. खताच्या प्रतिगोणीमागे ११० ते २५० रुपयांपर्यंतचे दर वाढवले आहेत. साधारण १५ ते २० टक्‍क्‍यांपर्यंतची ही दरवाढ आहे. दरवाढीचा हा निर्णय आता शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे.   खत कंपन्यांतील आघाडीची सहकारी कंपनी असलेल्या ‘इफ्को''ने पाच दिवसांपूर्वी २७ सप्टेंबरला यासंबंधीचे पत्र जारी केले आहे. आता या कंपनीनंतर अन्य काही खासगी कंपन्यांही या दरवाढीचे अनुकरण करत निर्णय घेणार आहेत. या पत्रानुसार एक ऑक्‍टोबरपासून ही दरवाढ लागू असणार आहे. नव्या दरवाढीत प्रामुख्याने एनपीके खताच्या किमती वाढल्या आहेत. त्यात १०ः२६ः२६, डीएपी, १२ः३२ः१६ः आणि पोटॅश या खताच्या किमतींचा समावेश आहे. त्यात किमान ११० रुपयांपासून २५० रुपयांपर्यंतची दरवाढ आहे. 

भारतात बहुतेक सर्व खते विशेषतः फॉस्फेटिक व पोटॅशिक खते आयात केली जातात. सध्या डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत असल्याने खताच्या किमती वाढवण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. शिवाय उत्पादन खर्च आणि विक्री याचा मेळ बसत नसल्यानेही दरवाढ अपरिहार्य झाल्याचे सांगण्यात आले. पण दुसरीकडे थेट ग्रामीण स्तरावर मात्र वस्तुस्तिथी वेगळी आहे. राज्याच्या अनेक भागात पाऊस नसल्याने विशेषतः मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, खानदेश, पश्‍चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली आदी भागात खरिपातील खताचा साठा पुरेशा प्रमाणात विक्री होऊ शकलेला नाही. रब्बीबाबतच्या आशाही मावळल्या आहेत. आहे ती खते संपता संपत नाहीत, नव्या वाढीव दराची खते विकायची कशी? हा प्रश्‍न आहे. 

सुमारे अडीच लाख टन खतसाठा शिल्लक राज्यात प्रामुख्याने एनपीके मध्ये १०ः२६ः२६, डीएपी या खतांना सर्वाधिक मागणी असते. दरवर्षी खरिपात मोठ्या प्रमाणात या खतांची विक्री होते.पण यंदा २५ टक्केही खते विक्री होऊ शकली नाहीत. पुरेशा पावसाअभावी राज्यात सध्या सुमारे अडीच लाख टनापर्यंतचा खतसाठा शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. त्यात जवळपास सव्वालाख टनापर्यंत १०ः२६ः२६ आणि डीएपीचाच समावेश आहे. 

शेतकऱ्यांवर संकटाची मालिका आधीच दुष्काळाने शेतकरी संकटात आला आहे. त्यात इंधनदरवाढीने यांत्रिकशेतीवरही परिणाम झाला असताना आता खताच्या किंमती वाढल्याने शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका संपण्याचे काही नाव घेत नसल्याचे दिसते आहे. किमतीत झालेली वाढ (रुपयांत)

एनपीके खत पूर्वी  आता  वाढ
१०ः२६ः२६   १२३५  १३४०  १०५ 
डीएपी १२९०  १४००   ११०
१२ः३२ः१६ १२४० १३५० ११०
पोटॅश ७००  ९५०    २५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com