भाषादिनीच विधिमंडळात मराठीसाठी एल्गार !

 भाषादिनी विधिमंडळात मराठीसाठी एल्गार!
भाषादिनी विधिमंडळात मराठीसाठी एल्गार!

मुंबई : राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करण्याच्या मागणीवरून मराठी भाषादिनी (मंगळवारी, ता. २७ ) विधिमंडळात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाले होते. तर दोन्ही सभागृहांत मराठीच्या ज्ञानभाषेच्या संदर्भात ठराव मांडण्यात आला.

सुरवातीलाच मराठी अभिमान गीताची कडवी ७ असतानाही फक्त ६ कडवी असलेले पत्रक वाटण्यात आल्याची बाब अजित पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. तर महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमामध्ये अभिमान गीत सुरू असतानाच माईक बंद पडल्याची बाब लक्षात आणून देतानाच त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे कोणी मुद्दाम करत आहे का? हे कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले होते आणि त्यातून कोणाला काय मिळतेय याची चौकशी करा, अशी मागणीही अजित पवार यांनी सभागृहात केली. मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठीचा अपमान होत असल्याच्या या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज १५ मिनिटे तहकूब करण्यात आले. कामकाज सुरू झाल्यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले, की ही मूळ कविता सुरेश भट यांनी रूपगंधामध्ये प्रकाशित केली होती. त्यांनतर रूपगंधा पुस्तकात सुरेश भट यांनी सहा कडवी असलेली कविताच प्रकाशित केली होती. अभिमान गीतात सहाच कडवी म्हटली जातात, असेही तावडे यांनी सांगितले.

मराठी विषय शाळांमध्ये सक्तीचा करा; कारण काही मुलांना मराठी नीट वाचता किंवा लिहिता येत नाही. कर्नाटकात कन्नडची सक्ती आहे, तर महाराष्ट्रात मराठीची सक्ती का नाही? असा सवाल करत राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी ‘मला कुणाचा अपमान करायचा नाही; पण सभागृहातील काही सदस्यांनाही मराठी नीट येत नाही’, याबाबत नाराजी व्यक्त करतानाच मराठी भाषा टिकण्यासाठी हा निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे. हा निर्णय घेतला तरच मराठी भाषा टिकेल, अशी भूमिका पवार यांनी या वेळी घेतली. सभागृहातदेखील काही सदस्यांना मराठी येत नाही. महाराष्ट्रात राहिल्यावर मराठी लिहिता-वाचता आले पाहिजे. पुढच्या एक जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली. यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मराठीची सक्ती शाळांमध्ये करण्याबाबतचा निर्णय शिक्षण विभागाच्या विचाराधीन आहे. सध्या आठवीपर्यंत मराठी सक्तीची आहे. मराठीची सक्ती 10 वी पर्यंत करावी की 12 वीपर्यंत करावी यासाठी विचार सुरू असल्याचे सांगत याचे धोरण अभ्यास मंडळ ठरवते. त्यामुळे सभागृहात आलेला हा विषय अभ्यास मंडळासमोर ठेवू, असे तावडे यांनी सभागृहात सांगितले. एकीकडे मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम राबविले जात आहेत; मात्र दुसरीकडे जिल्हा परिषद शाळा बंद करण्याची पत्रके येताहेत, असा आरोप करत राज्यातील १,३०० शाळा बंद केल्या असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. मराठी भाषेच्या प्रती बेगडी प्रेम हे सरकार दाखवित असल्याचे विखे म्हणाले.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी? सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते जयंत पाटील यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा कधी देणार हा मुद्दा सभागृहामध्ये लावून धरला; मात्र त्यावर योग्य ते उत्तर न दिल्यामुळे सभागृहामध्ये गोंधळ झाला आणि त्यामुळे सभागृह काही काळासाठी तहकूब करण्यात आले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, याची जबाबदारी विनोद तावडे यांच्याकडे होती. त्या कामाची सद्यःस्थिती काय आहे? दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करण्याचा निर्णय कधीपर्यंत घ्याल, असे सवाल गटनेते जयंत पाटील यांनी सभागृहामध्ये केले.

विधान परिषदेतही मराठी भाषेसाठी गोंधळ... मराठीचा ढोल बडवत गेल्या चार वर्षांत जे सत्तेवर बसले आहेत, त्यांना हा ठराव मांडावा लागला यापेक्षा जास्त नामुष्की मराठी भाषेवर आलेली नाही, असा टोला आमदार सुनील तटकरे यांनी सभापतींच्या मराठी भाषेच्या ठरावावर बोलताना सरकारला लगावला. लोकराज्य मासिक गुजराथीमध्ये चालू करण्याची किमया याच सरकारच्या काळात झाली. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असते तर असे झाले नसते. एका बाजूला आपण बेळगावात कानडीच्या सक्तीच्या विरोधात लढत आहोत, दुसऱ्या बाजूला लोकराज्य गुजराथीत चालू करण्याचे शिवसेना समर्थन करत आहे, यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाही, असेही तटकरे म्हणाले. आम्ही सत्तेत असताना मराठी रात्रशाळा सुरू केल्या होत्या. आज मराठी शाळांची गळचेपी केली जात आहे. या निर्णयाचा सरकार खुलासा करेलच; पण राज्यातील ग्रामीण भाग व कोकणातील वाड्या-वस्त्यांतील विद्यार्थ्यांना याची झळ बसेल, असे तटकरे म्हणाले.

मराठी भाषा विभागात ४० टक्के पदे रिक्त- मराठी भाषा दिन साजरा करत असताना मराठी भाषा विभागाला पूर्णवेळ सचिव नाही आणि मराठी भाषा विभागातील ४० टक्के पदे रिक्त आहेत, ही गंभीर बाब मराठी भाषा विषयाच्या ठरावावर बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निदर्शनास आणून देत, तीव्र नाराजीही व्यक्त केली. मराठी भाषा विभागातील ४० टक्के पदे रिक्त आहेत. मंत्रालयातील अनेक सचिव, अधिकारी यांच्या टिप्पणी मराठीत नसतात. मुख्यमंत्रीही अनेक कार्यक्रमामध्ये हिंदी, इंग्रजी भाषांत बोलतात, मराठी भाषेची उपेक्षा सुरू आहे. त्यामुळे मराठी भाषेबद्दल ठराव मांडला जात असताना, या बाबींचाही विचार व्हावा, अशी सूचनाही धनंजय मुंडे यांनी मांडली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com