मराठवाड्यातील पाणीसाठे तळाला
मराठवाड्यातील पाणीसाठे तळाला

मराठवाड्यातील पाणीसाठे तळाला

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळाचं संकट जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यानंतर भीषणतेच्या दिशेने वाटचाल करते आहे. तिसऱ्या आठवड्याअखेर ८७२ प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा १३ टक्‍क्‍यांवर आला आहे. १८३ लघू व मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले असून २८९ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. तेरणा मांजरा रेणा नदीवरील २४ पैकी २० बंधाऱ्यांत उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. 

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी येलदरी, मांजरा, माजलगाव, सिनाकोळेगाव प्रकल्पांतील पाणीसाठा उणेमध्ये गेला आहे. दुसरीकडे मोठ्या ११ प्रकल्पांत केवळ १५ टक्‍केच उपयुक्‍त पाणी आहे. ७४९ लघू प्रकल्पांत केवळ ९ टक्‍केच उपयुक्‍त पाणी शिल्लक आहे. गोदावरी नदीवरील १३ बंधाऱ्यांमध्येही केवळ १४ टक्‍केच उपयुक्‍त पाणी आहे. मध्यम ७५ प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा ९ टक्‍क्‍यांवर आला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत केवळ ४ टक्‍केच उपयुक्‍त पाणी शिल्लक आहे. जालना जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पांत २ टक्‍के, बीडमधील १६ मध्यम प्रकल्पांत ६ टक्‍के, उस्मानाबादमधील १७ मध्यम प्रकल्पांत ९ टक्‍के, नांदेडमधील ९ मध्यम प्रकल्पांत २२ टक्‍के, लातूरमधील ८ मध्यम प्रकल्पांत १६ टक्‍के तर परभणीमधील २ मध्यम प्रकल्पांत केवळ १३ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठाचा शिल्लक आहे. मोठ्या प्रकल्पांपैकी तब्बल आठ प्रकल्पांत क्षमतेच्या तुलनेत २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी तर ३ प्रकल्पांत २५ ते ५० टक्‍क्‍यांदरम्यान उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली. 

लघू प्रकल्पांची अवस्था भीषण  मराठवाड्यातील जालना, बीड, लातूर, उस्मानाबादमधील लघू प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची अवस्था भीषणतेच्या दिशेने वाटचाल करते आहे. जालना जिल्ह्यातील ५७ लघू प्रकल्पांत केवळ २ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. दुसरीकडे बीड जिल्ह्यातील १२६ लघू प्रकल्पांत केवळ ३ टक्‍केच उपयुक्‍त पाणी आहे. लातूर जिल्ह्यात १३२ लघू प्रकल्पांत केवळ ५ टक्‍के उपयुक्‍त पाणी शिल्लक असून उस्मानाबाद जिल्ह्यातील २०५ लघू प्रकल्पांतही केवळ ९ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पांची अवस्था बिकट असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील ९३ लघू प्रकल्पांतही केवळ १२ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली. 

४६ मध्यम प्रकल्पांत नाही उपयुक्‍त थेंब  मराठवाड्यातील ७५ पैकी तब्बल ४६ मध्यम प्रकल्पांत उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील १४ मध्यम प्रकल्पांसह जालन्यातील ६, बीडमधील १२, लातूरमधील ३, उस्मानाबाद ८, नांदेड २ तर परभणी जिल्ह्यातील १ मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com