नागपूर ः धानावर या वर्षी झालेला कीड-रोगांचा प्रादुर्भाव, अत्यल्प पाऊस या कारणांमुळे जेमतेम क्षेत्रावर झालेली उन्हाळी धान लागवड या सर्व बाबींचा फटका धानपट्ट्यातील बाजार समित्यांना बसला आहे. शेतकऱ्यांना पुरेशा सुविधा तर दूरच, परंतु कर्मचाऱ्यांच्या पगाराकरिता पैशांची उपलब्धता करण्याचेही आव्हान त्यांच्यासमोर निर्माण झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
नागपूर विभागातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांमध्ये धान (भात) लागवड होते. धानाचे नागपूर विभागात ७ लाख ३४ हजार ३०० हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात ७ लाख १४ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर धान लागवड झाली. २० हजार हेक्टर क्षेत्र रोवणीखाली आलेच नाही. त्यातच किडींचा प्रादुर्भाव धानावर झाल्याने त्याचा थेट उत्पादकतेला फटका बसला.
गेल्यावर्षीच्या पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षानुसार २०.५० क्विंटल हेक्टरी उत्पादकता धानाची झाली होती. या वर्षी कीड-रोगाच्या परिणामी ही उत्पादकता हेक्टरी सात क्विंटलने कमी होत अवघी १३ क्विंटलवर आली. या साऱ्यांचा फटका बसल्याने बाजार समित्यांमधील धानाची आवकही मंदावली.
भंडारा जिल्हयातील एका प्रसिद्ध बाजार समितीच्या सभापतींनी दिलेल्या माहितीनुसार, हंगामात ८ ते १० हजार पोत्यांची आवक होत होती. या वर्षी कीड-रोगामुळे उत्पादकता घटली आणि ही आवक १५०० ते २००० पोत्यांवर आली आहे. परिणामी बाजार समितीला सेसच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातही घट झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पगाराकरिता पैशांची सोय करण्याचे आव्हान या वर्षी पहिल्यांदाच निर्माण झाले आहे.
पगाराकरिता पैसा नसल्याने शेतकऱ्यांकरिता प्रस्तावित सुविधांकरिता पैशांची कशी सोय करावी, असाही प्रश्न आहे. भंडारा जिल्ह्यात सर्वदूर ही परिस्थिती असल्याचे बाजार समित्यांशी निगडित सूत्रांकडून सांगण्यात आले.
संरक्षित सिंचनाची सोय असलेले शेतकरी उन्हाळी धान लागवड करतात. हे क्षेत्र सरासरी १६ हजार ७०० हेक्टर आहे. गेल्या आठवड्यापर्यंतच्या आकडेवारीनुसार १० हजार ६२ हेक्टर रोवणी झाली होती. यंदा ६ हजार हेक्टरने हे क्षेत्र कमी झाले आहे.