भागधारक शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी गाजली महाबीजची सभा

सभेला सुरवात होताच बोलणाऱ्या प्रत्येक सभासदाने महाबीज ही शेतकऱ्यांची संस्था असून गेल्या काही वर्षांत अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने प्रशासन चालविले असल्याचे सांगितले.
भागधारक शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी गाजली महाबीजची सभा
भागधारक शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी गाजली महाबीजची सभा

अकोला : सातत्याने नफ्यात राहणाऱ्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या भागधारकांची सर्वसाधारण सभा शेतकऱ्यांनी केलेल्या विविध प्रश्नांच्या सरबत्तीने गाजली. बियाण्याचे दर, गेल्या हंगामातील हरभरा बियाणे वाटप घोटाळा, कर्मचारी पतसंस्थेतील भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाचे स्पायरल सेपरेटर वाटप, अभ्यास दौरे अशा विविध मुद्यांवर शेतकरी भागधारकांनी महाबीज प्रशासनावर थेट ताशेरे अोढले.

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या भागधारकांची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (ता. ४) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात अायोजित करण्यात अाली होती. यावेळी राज्याचे कृषी अायुक्त सचिंद्रप्रताप सिंह, खासदार संजय धोत्रे, वल्लभराव देशमुख, डॉ. अनिता चोरे, व्यवस्थापकीय संचालक अोमप्रकाश देशमुख, अामदार रणधीर सावरकर व इतर व्यासपीठावर उपस्थित होते.

सभेच्या सुरवातीलाच महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्याचे सचिव विजयकुमार हे अनुपस्थित असल्याचे निदर्शनास येताच शेतकरी सभासदांनी गोंधळ घालणे सुरू केले. अध्यक्षच नसल्याने या सभेला काही अर्थ नसल्याचे सांगत बऱ्याच शेतकऱ्यांनी नाराजी नोंदवत सभागृहातून बाहेर जाणे पसंत केले. बराच काळ हा गोंधळ सुरू होता.

थोड्या वेळाने वातावरण निवळले. त्यानंतर सभेला सुरवात होताच बोलणाऱ्या प्रत्येक सभासदाने महाबीज ही शेतकऱ्यांची संस्था असून गेल्या काही वर्षांत अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने प्रशासन चालविले असल्याचे सांगितले. महाबीज कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेतील घोटाळा गेली अनेक महिने गाजत अाहे. महाबीजमध्ये नोकरीला असलेल्या पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध बडतर्फीची कारवाई का होत नाही, असा प्रश्ना उपस्थित करण्यात अाला.

गेल्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना वाटलेल्या हरभऱ्याचे प्रकरण वर्षभरापासून गाजत अाहे. कृषी केंद्रधारक शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन प्रतिज्ञापत्र भरून मागत अाहेत. कृषी विभागाने केलेल्या चौकशीत महाबीजने अधिक प्रमाणात देयक सादर केल्याचे समोर अाले अाहे. असे असताना कारवाई का केली जात नाही, असे भागधारकांनी विचारले.

सध्या बीज प्रमाणीकरण यंत्रणा चुकीच्या पद्धतीने काम करीत अाहे. भ्रष्टाचार बोकाळला असून कंपनी ॲक्टनुसार कामकाज चालत नसल्याचा ठपका एका भागधारकाने केला. कंपनी कायद्यानुसार दोन टक्के सीएसअार खर्च होणे गरजेचा असताना गेल्या तीन वर्षातील एक कोटी ९३ लाख रुपये तसेच पडून असल्याची बाब या शेतकऱ्याने सभागृहाच्या निदर्शनास अाणून दिली.

महाबीजच्या पुढाकाराने होणारे भागधारकांचे दौरेसुद्धा चुकीच्या पद्धतीने घेतले जातात. काही विशिष्ट लोकांना लाभ दिला जात असल्याचा अारोपही करण्यात अाला. बुलडाणा जिल्ह्यातील रामेश्वर पाटील नावाच्या भागधारक शेतकऱ्याने तर मागील हंगामात मध्य प्रदेशात सोयाबीन बियाणे बाजारदरापेक्षा अधिक खरेदी केल्याचा अारोप करीत यात लाखाेंचा घोळ असल्याचे सांगतिले.

सभेची वेळ चुकीची एका भागधारकाने अाजच्या या सभेची वेळच चुकीची असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांचा सोयाबीन काढणीचा हंगाम, रब्बीची तयारी सुरू झालेली असताना सभा घेणे अयोग्य असल्याचे हा शेतकरी म्हणाला. शिवाय ज्या सभागृहात सभा घेतली जात होती त्यामध्ये कुणाचेच बोलणे कुणाला समजत नव्हते. सभागृहात समोरील लोकांना तेवढे एेकायला येत होते. मागे बसलेल्यांमध्ये सारखा गोंधळ सुरू होता.

कारवाई करणार ः सिंह अकोला जिल्ह्यात गाजत असलेल्या हरभरा बियाणे वाटप घोळ प्रकरणाचा अहवाल कालच प्राप्त झाला अाहे. त्यानुसार दोषींविरुद्ध निश्चित कारवाई केली जाईल, असे यावेळी कृषी अायुक्त सचिंद्रप्रताप सिंह म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com