सांगली ः पंतप्रधान कृषी सिंचन योजनेचा २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यातील सुमारे १५ हजार २३८ शेतकऱ्यांनी लाभ घेतला असून, १९ कोटी ८१ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सुमारे ८३३५ हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
शासनाने सिंचन योजनेत शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा यासाठी निधीची तरतूद केली आहे. एकूण निधीच्या ६० टक्के हिस्सा हा केंद्र तर ४० टक्के हिस्सा राज्य शासनाचा आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यापर्यंत ही योजना सक्षमपणे पोहोचवली आहे. या योजनेचा जिल्ह्यातील १५ हजार २३८ शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे.
यात तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. कडेगाव, जत, मिरज, आटपाडी या तालुक्यातील शेतकऱ्यांनीदेखील या योजनेचा लाभ घेतला आहे. मुळात जत, आटपाडी, आणि तासगाव तालुक्यात सातत्याने पाणीटंचाई भासते. त्यामुळे या भागातील शेतकरी सूक्ष्म सिंचनाला प्राधान्य देत आहेत. त्यातच द्राक्ष, डाळिंब ही पिके याच भागात आहेत. त्यामुळे या पिकांना सूक्ष्म सिंचन केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे या योजनेत या तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या अधिक दिसून येते.
अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत ५५, तर इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान दिले जाते.
शेतकऱ्यांना मिळणारे विविध योजनांचे अनुदान आता थेट बॅंकेच्या खात्यावर जमा होत आहे. सूक्ष्म सिंचन संचाची तपासणी केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी योजनेतील अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा करीत आहेत.