कोल्हापूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटनेचा घट येथे घटस्थापनेदिवशी बसवून नव्या संघटनेची घोषणा केली. ‘संवादातून संघर्षाकडे’ असे ब्रीदवाक्य घेऊन संघटना येथून पुढच्या काळात वाटचाल करणार आहे.
इतके दिवस शेतकरी संघटना या फक्त शेतीप्रश्नावरच लढत होत्या. परंतु सदाभाऊ यांची रयत क्रांती संघटना केवळ शेतीप्रश्नावर लढणार नसून, शेतीपूरक व्यवसायाच्या अडचणीबरोबरच महिला, युवक, रोजगार, शिक्षण या विभागांतही ही संघटना काम करणार असल्याचे श्री. खोत यांनी सांगितले आहे. ही इतर क्षेत्रांतील लोकांसाठी दिलासादायक माहिती असली, तरी याचा लढा उभारण्याचे आव्हान सदाभाऊंच्या नव्या संघटनेपुढे आहे.
‘नामकरणा’च्या पहिल्या मेळाव्यात गर्दी खेचण्यात ते यशस्वी झाले असले, तरी ही गर्दी प्रत्यक्षात कामकाज करताना कायम राहण्यासाठी त्यांच्या संघटनेला खूप कष्ट घ्यावे लागतील याची जाणीव त्यांनाही आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांच्या सभा या भावनिकही असतात. सदाभाऊंच्या सभेलाही भावनिकतेची किनार होती. त्यांच्यासह त्यांच्या पुत्र सागर यांनी आपल्यावर सातत्याने स्वभिमानीत अन्याय झाल्याची भावना बोलून दाखविली. आम्ही कशी चळवळ उभी केली; आणि चळवळीतीलच इतर लोकांनी आमच्या कामाकडे दुर्लक्ष करीत आम्हाला कसे बाजूला केले याचा पाढाच या मेळाव्यात वाचला. जरी खासदार राजू शेट्टी यांचे नाव घेतले नसले तरी संपूर्ण भाषणाचा ओघ हा त्यांनी अन्याय केल्याचाच होता.
शेट्टी यांच्या संघटना विस्तारात भावनिक आवाहन हे महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्याची ‘री’ सदाभाऊंची संघटना ओढत असल्याचे चित्र मेळाव्यात होते. आपल्यावर अन्याय झाला आहे आणि तो दूर करायचाच; यासाठी एकत्र अशीच साद या वेळी नेत्यांनी घातली.
एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात
सध्या प्रचलित काही शेतकरी संघटनांची अवस्था पाहिली तर फारशी भूषणावह नाही. शेतीप्रश्नापेक्षा एकमेकांच्या भूमिकेविषयी टीका करून शेतीप्रश्नाची धार बोथट करण्याचा प्रयत्न सातत्याने होत असतो. यामुळे शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. ही संघटना म्हणजे एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात असे वर्णन करावे लागेल.
कारण थेट सरकारविरोधी रस्त्यावरचे आंदोलन संघटना करणार नाही; कारण सदाभाऊंवर नेहमीच सरकारचा दबाव असेल, हे निश्चित आहे. अशा या परिस्थितीत शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सदाभाऊंकडून किती वेगात होईल याचे उत्तर भविष्यातील त्यांच्या संघटनेची वाटचाल कशी राहते यावरच ठरणार आहे.