मराठवाड्यातील लघू प्रकल्प आले २७ टक्‍क्‍यांवर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८६४ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह विविध नद्यांवरील बंधाऱ्यांमधील उपयुक्‍त पाणी झपाट्याने आटते आहे. आटणाऱ्या या पाण्याने चिंतेत भर घालणे सुरू केले आहे. मराठवाड्यातील ७४३ लघू प्रकल्पांत केवळ २७ टक्‍के उपयुक्‍त पाणी शिल्लक असून ७५ मध्यम प्रकल्पांतही केवळ ३९ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. औरंगाबाद जिल्हा टंचाईच्या सर्वाधिक रडारवर असल्याचे चित्र आहे.

मराठवाड्यात एकूण ७४३ लघू प्रकल्प आहेत. या लघू प्रकल्पांमध्ये आजघडीला केवळ २७ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी १६ फेब्रुवारी २०१७ अखेर या प्रकल्पांमध्ये ४४ टक्‍के तर १६ फेब्रुवारी २०१६ अखेर ५ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक होता. परभणी जिल्ह्यातील २२ लघू प्रकल्पात सर्वात कमी १३ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक असून त्यापाठोपाठ हिंगोली जिल्ह्यातील २७ प्रकल्पात १४ टक्‍के, औरंगाबाद जिल्ह्यातील ९० प्रकल्पात १७ टक्‍के, जालना जिल्ह्यातील ५७ प्रकल्पात १८ टक्‍के तर नांदेड जिल्ह्यातील ८८ लघू प्रकल्पांत केवळ १९ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.

परतीचा पाऊस बरा झालेल्या बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील लघू प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठ्याची स्थिती यापेक्षा थोडी बरी असली तरी समाधानकारक मात्र नक्‍कीच नाही. बीड जिल्ह्यातील १२६ लघू प्रकल्पात ३७ टक्‍के, लातूर जिल्ह्यातील १३२ प्रकल्पात ३२ टक्‍के तर उस्मानाबाद जिल्ह्यातील २०१ लघू प्रकल्पात केवळ ३४ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.

या सर्वच जिल्ह्यांमधील लघू प्रकल्पात गतवर्षी २८ ते ५९ टक्‍क्‍यांदरम्यान उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक होता. अकरा मोठ्या प्रकल्पांमध्ये ४३ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. या अकरा प्रकल्पांपैकी येलदरी व उर्ध्व पेनगंगा या दोन प्रकल्पांमध्ये प्रत्येकी पाच टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.

मोठ्या प्रकल्पांपैकीच एक असलेल्या निम्न मनार प्रकल्पातही केवळ १३ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. तर अनेक वर्षानंतर प्रथमच काठोकाठ भरलेला जायकवाडी प्रकल्पही फेब्रुवारीच्या मध्यान्हातच ७० टक्‍क्‍यांवर आला आहे. मोठ्या प्रकल्पांपैकी बीड जिल्ह्यातील मांजरा व उस्मानाबाद जिल्ह्यातील निम्न तेरणा प्रकल्पातच ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद जिल्ह्यात १६ मध्यम प्रकल्प आहेत. या सोळाही मध्यम प्रकल्पांपैकी ९ प्रकल्पांमध्ये उपयुक्‍त पाणीसाठाच शिल्लक नाही. ज्या सात प्रकल्पांमध्ये उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे, तोही ८ टक्‍क्‍यांच्या पुढे नाही.

दहा मध्यम प्रकल्प कासावीस मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी दहा मध्यम प्रकल्प कासावीस झाले आहेत. औरंगाबादमधील नऊ व नांदेड जिल्ह्यातील महालिंगी या मध्यम प्रकल्पाचा यामध्ये समावेश आहे. उपयुक्‍त पाणीसाठाच शिल्लक नसलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ प्रकल्पांमध्ये लाहूकी, गिरजा, वाकोद, खेळणा, अंजना पळशी, शिवना टाकळी, टेंभापुरी, नारंगी, बोरदहेगाव या प्रकल्पांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com