निम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सून परतला

नकाशातील हिरवी रेषा मॉन्सूनची परतीची सिमा दर्शविते
नकाशातील हिरवी रेषा मॉन्सूनची परतीची सिमा दर्शविते

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (माॅन्सून) परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. शुक्रवारपर्यंत (ता. ५) देशाच्या बहुतांशी भागातून माॅन्सूनने माघार घेतली अाहे. तर संपूर्ण विदर्भ, खाणदेश, उत्तर कोकणासह जवळपास निम्मा महाराष्ट्रातून मॉन्सून परतला अाहे. डहाणू, वाशीम गडचिरोलीतील सिरोंचापर्यंत वाऱ्यांनी परतीचा टप्पा पूर्ण केला आहे. सोमवारपर्यंत (ता. ८) मॉन्सून देशाचा निरोप घेण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.  अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे माॅन्सूनची परतीचा वेग वाढला आहे. २९ सप्टेंबर रोजी पश्‍चिम राजस्थानमधून परतीच्या प्रवासला निघालेल्या माॅन्सूनने अवघ्या सहा दिवसांमध्ये वायव्य, उत्तर, ईशान्य आणि पूर्व भारतासह महाराष्ट्राच्या अनेक भागांचा निरोप घेतला आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून (ईशान्य मॉन्सून) पाऊस पडतो. त्यामुळे महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकमधून वारे माघारी फिरताच संपूर्ण देशातून मॉन्सून परतल्याचे जाहीर करण्यात येते. सर्वसाधारण नियोजित वेळेनुसार १५ ऑक्टोबरपर्यंत मॉन्सून देशातून परत जातो.  शुक्रवारी मॉन्सूनने मोठा टप्पा पार करत ईशान्य भारत, पश्‍चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, झारखंड, ओडिशा, गुजरात राज्याच्या संपूर्ण भागासह छत्तीसगडचा बहुतांशी भाग, उत्तर बंगालचा उपसागर आणि महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून काढता पाय घेतला आहे. यंदा जवळपास एक महिना उशिराने परतीचा प्रवास सुरू केल्यानंतर कमी कालावधीत मॉन्सून देशातून परतण्याची शक्यता आहे. सोमवारपर्यंत (ता. ८) मॉन्सून संपूर्ण देशातून परतण्याचे संकेत असून, तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, कर्नाटकसह दक्षिण भारतात ईशान्य मॉन्सून सक्रीय होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.  कमी दाब क्षेत्र होतय तीव्र अरबी समुद्रात लक्षद्वीप आणि मालदिव बेटांच्या परिसरावर शुक्रवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याची तीव्रता वाढून उद्यापर्यंत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होईल. हे चक्रीवादळ आेमानच्या किनाऱ्याकडे सरकणार आहे. मंगळवापर्यंत (ता. ९) तामिळनाडू, केरळ, कर्नाटकमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. समुद्र खवळून उंच लाटा उसळण्याची शक्यता असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर बंगालच्या उपसागरातही सोमवापर्यंत (ता. ८) आणखी एक कमी दाब क्षेत्र तयार होण्याचे संकेत असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.  कोरड्या हवामानाचा अंदाज   राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडत अाहे. सोमवारपर्यंत कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, राज्याच्या उर्वरित भागात हवामान मुख्यत: कोरडे राहण्याचा अंदाज आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com