जळगाव ः नैसर्गिक व इतर संकटांमुळे रावेरातील केळी उत्पादकांना रोज कोट्यवधींचा फटका बसत आहे. वेगवान वाऱ्यामुळे केळीचा दर्जा घसरल्याने परदेशातील निर्यात प्रतिदिन ४० टनने कमी झाली आहे. त्याच वेळी निपाह व इतर रोगराईच्या पंजाब, दिल्लीमधील बाजारातील अफवेमुळे रोजची ३०० क्विंटल लूज (घड) केळीची वाहतूकही ठप्प झाली आहे. परिणामी दरांवर मोठा दबाव आला असून, लूज (घडांच्या स्वरूपातील) वाहतुकीसंबंधीच्या केळीचे दर ९०० वरून ६०० रुपयांवर आले आहेत. मे महिन्यात वेगवान वारे होते. परिणामी केळीची पाने फाटली. स्कर्टिंग बॅगही निघतील, एवढा वेग वाऱ्याचा होता. यामुळे घडांवर डाग पडले. तापी काठावरील काही गावांमधील मोजक्याच शेतकऱ्यांची केळी परदेशात निर्यातक्षम दर्जाची राहिली आहे. १० मेपूर्वी प्रतिदिन चार कंटेनर (८० टन) केळीची निर्यात परदेशात विविध कंपन्या करीत होत्या. आजघडीला प्रतिदिन दोन कंटेनर केळीची परदेशात निर्यात सुरू आहे. तिलाही जादा दर मिळत नसल्याची माहिती मिळाली. एक हजार रुपये प्रतिक्विंटलचे दर निर्यातीसंबंधी कंपन्या सध्या देत आहेत. परदेशात निर्यातक्षम केळी तांदलवाडी व निंबोल भागात होती. तिची ९० टक्के कापणी मे महिन्याच्या मध्यापर्यंतच झाली आहे. नंतर मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील दापोरा, नाचणखेडा भागात परदेशात निर्यातक्षम केळी उपलब्ध झाली होती; पण तेथेही वादळाचा फटका बसला आहे. दिल्ली व पंजाबमध्ये रावेर, यावलमधून प्रतिदिन २५मोठ्या मालवाहू मोटारी (एक मोटार १५ मेट्रिक टन क्षमता) केळीची पाठवणूक होत होती. या महिन्याच्या सुरवातीलाच रावेरात केळीला वादळाचा फटका बसला. नंतर बाजारात दर कमी झाले, यात दुहेरी फटका केळी उत्पादकांना बसत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.