पंधरा हजार धरण, तलावांतील गाळ काढणार : मुख्यमंत्री

पंधरा हजार धरण, तलावांतील गाळ काढणार : मुख्यमंत्री
पंधरा हजार धरण, तलावांतील गाळ काढणार : मुख्यमंत्री

मुंबई : राज्यातील छोटी धरणे, तलाव यांमधील गाळ काढून तो शेतात टाकल्यावर कृषी उत्पादनात वाढ होताना दिसून आले आहे. त्यामुळे या वर्षी ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजने’च्या माध्यमातून १५ हजार छोट्या मोठ्या धरण आणि तलावांतील गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. तसेच या योजनेसाठी शासनाला खासगी कार्पोरेट कंपन्यांनी साह्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. सह्याद्री अतिथिगृह येथे दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जलसंवर्धन करण्यासाठी खासगी संस्थांचे सहकार्य घेण्याबाबत मंगळवारी (ता. ११) बैठक झाली. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंधारणमंत्री राम शिंदे, पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाचे काम करणारे अभिनेता आमीर खान आदी या वेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, की जलयुक्त शिवार योजनेसोबतच ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना’ महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून हाती घेतला आहे. धरण आणि विविध पाणी साठ्यांतून गाळ काढून तो शेतकऱ्यांना दिला जातो. त्याच्या माध्यमातून शेतीमध्ये सुपीकता आणून कृषी उत्पादन वाढविण्यासाठीही त्याचा लाभ होतो. या वर्षी महाराष्ट्र दुष्काळाचा सामना करतो आहे. त्यामुळे ही योजना मोठ्या प्रमाणावर राबविण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले पाहिजे. विविध पाणीसाठ्यांमधील गाळ काढल्याने मौल्यवान असलेल्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडविला जावा यासाठी प्रयत्न केला जात आहे. गेल्या वर्षी सुमारे तीन हजार विविध पाणीसाठ्यांतून ३.२३ कोटी क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला. या वर्षी किमान १५ हजार पाणीसाठ्यामधील गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवावे. जलसंधारणाचे हे काम करताना शासनाच्या हातात हात घालून खासगी संस्थांनी पुढे यावे. राज्यात जलसंधारण ही लोकचळवळ झाली असून, दुष्काळी परिस्थितीत जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेतली पाहिजेत. जेणेकरून भविष्यात कमी पर्जन्यमान झाले, तरी टंचाईचे चटके सोसावे लागणार नाहीत. शेतात गाळ टाकल्याने सुपीकता निर्माण झाली. परिणामी, शेतीच्या उत्पादकतेत वाढ होऊन रासायनिक खतांच्या वापरातदेखील घट झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजने’साठी जिल्हा प्रशासनातर्फे यंत्रसामग्री आणि डिझेल पुरविले जाते. या कामासाठी कार्पोरेट संस्था पुढे येऊन काही जिल्हे दत्तक घेतले तर मोठ्या प्रमाणावर त्याचा लाभ होईल. दुष्काळमुक्त महाराष्ट्र मोहिमेत खासगी संस्थांनीदेखील सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. अभिनेते आमीर खान म्हणाले, की ज्याप्रमाणे नृत्य, गायन याच्या स्पर्धा घेतल्या जातात, त्याप्रमाणे पाणलोट क्षेत्र विकासाच्या स्पर्धा वॉटर कपच्या माध्यमातून आम्ही घेतल्या आणि त्याला गावांनी भरभरून प्रतिसाद दिला. तीन तालुक्यांपासून सुरवात केलेल्या या मोहिमेत ३० तालुके आणि त्याच्या नंतर आता ७५ तालुक्यांनी सहभाग घेतला. लोकसहभागाची ही मोठी चळवळ बनल्याचे त्यांनी सांगितले. आता शाळांमधून मुलांना जलसंधारणाच्या चळवळीबाबत मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. गोदरेज उद्योग समूहाचे अदि गोदरेज यांनी जलसंधारणावर भर देतानाच तृणधान्याच्या लागवडीसाठी अधिक प्रोत्साहन दिले पाहिजे, असे सुचविले. राज्यात ८५ हजार ४१३ पाणी साठे आहे. ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजने’च्या माध्यमातून गेल्या वर्षी ३.२३ कोटी क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला. त्यामध्ये ३१ हजार १५० शेतकऱ्यांना त्याचे वाटप करण्यात आले. ५४ हजार ४८१ एकर क्षेत्रावरील कृषी उत्पादन त्यामुळे वाढले आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी यंत्रे आणि डिझेल जिल्हा प्रशासनाकडून पुरविले जाते. या कामी खासगी संस्थांनी जिल्हे दत्तक घ्यावेत, असे जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी या वेळी सांगितले. बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, प्रधान सचिव भूषण गगराणी, पाणी फाउंडेशनचे सत्यजित भटकळ, अमित चंद्रा याबरोबरच गोदरेज, जिंदाल, टाटा ट्रस्ट, रिलायन्स, एल अँड टी आदी खासगी उद्योग समूहांचे प्रमुख उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com