नाफेडच्या खरेदी केंद्रांवर सोयाबीनला 'माॅईश्चर'चा खोडा

जिंतूर, जि. परभणी ः येथे नाफेडच्या खरेदी केंद्राचे सोमवारी (ता. १६) काटापूजन करून उद्‍घाटन करण्यात आले.
जिंतूर, जि. परभणी ः येथे नाफेडच्या खरेदी केंद्राचे सोमवारी (ता. १६) काटापूजन करून उद्‍घाटन करण्यात आले.

परभणी : नाफेडमार्फत आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात मूग, उडीद, सोयाबीनची शासकीय खरेदी केंद्रे कार्यान्वित केली जात आहेत. परंतु सोयाबीनमधील माॅईश्चरचे प्रमाण १४ ते १६ टक्के येत असल्यामुळे खरेदी होऊ शकत नाही. त्यामुळे दिवाळी सणासाठी पैशाची तातडीची गरज असेलेल्या शेतकऱ्यांना खुल्या बाजारात २००० ते २७०० रुपये प्रतिक्विंटल दराने सोयाबीन विक्री करावी लागत आहे.

दरम्यान नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ११ खरेदी केंद्रांवर सोमवार (ता. १६) पर्यंत १,८२८ शेतकऱ्यांनी मूग, उडीद, सोयाबीन आदी शेतमाल विक्रीसाठी नोंदणी केली आहे, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.

सोमवारी परभणी जिल्ह्यातील जिंतूर, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली आणि जवळा बाजार (ता. औंढा नागनाथ) या ठिकाणी सोमवारी (ता. १६) खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. जिंतूर येथे माजी खासदार गणेश दुधगावकर, विजय खिस्ते, संजय भांबळे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी के. जे. शेवाळे यांच्या उपस्थितीत काटा पूजन करून खरेदी केंद्राचे उद्घघाटन करण्यात आले.

या केंद्रावर मूग, उडिदाची आवक नाही. परंतु सोयाबीनमध्ये १४ ते १६ टक्के आर्द्रता आढळून येत असल्यामुळे ते नाफेडच्या निकषात बसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना १२ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता असलेल्या सोयाबीनची विक्री खुल्या बाजारात करावी लागत आहे.

आर्द्रतेच्या प्रमाणानुसार व्यापारी २००० ते २७०० रुपये प्रतिक्विंटल दराने सोयाबीनची खरेदी करत आहे. दिवाळी सणांसाठी अनेक शेतकऱ्यांना पैशाची गरज असल्यामुळे हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करावी लागत आहे.

दरम्यान, सोमवार (ता.१६) पर्यंत नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील केद्रावर ४०२ शेतकऱ्यांनी, बिलोली येथे १९५, धर्माबाद येथे ५१० शेतकऱ्यांनी एकूण ११०७, परभणी जिल्ह्यातील परभणी येथे ३९ शेतकऱ्यांनी, जिंतूर येथे ५, सेलू येथे ३०, मानवत येथे २३, गंगाखेड येथे ६ शेतकऱ्यांनी एकूण १०३ शेतकऱ्यांनी, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली येथे ५५० शेतकऱ्यांनी, जवळा बाजार येथे १८, वसमत येथे ५० शेतकऱ्यांनी एकूण ६१८ शेतकऱ्यांनी तीन जिल्ह्यात एकूण  १,८२८ शेतकऱ्यांनी हमीभावाने शेतमाला विक्रीसाठी आॅनलाइन नोंदणी केली आहे.

शेतकऱ्यांनी केंद्रावर सोयाबीन विक्रीस आणताना १२ टक्क्यांपेक्षा कमी आर्द्रता असलेले, काडीकचरा विरहित, एफएक्यू प्रतीचे सोयाबीन घेऊन यावे, अन्यथा गैरसोय होऊ शकते, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी रामप्रसाद दांड (नांदेड) आणि के. जे. शेवाळे (परभणी) यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com