नगर ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करण्यासाठी पहिल्यांदाच जिल्हा परिषदनेही पुढाकार घेतला आहे. जलयुक्त शिवार अभियानात निवडलेल्या २४१ गावांत २५७ गाव तलाव, पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे व साठवण बंधाऱ्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. या कामासाठी १४ कोटी ३२ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
दुष्काळात सर्वाधिक पिण्याच्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागले आहे. पिण्यासाठीच पाणी मिळत नसल्याने शेतीचा प्रश्न त्याहून गंभीर झाला. शेतीचे मोठे नुकसान दुष्काळात झाले. त्यामुळे दुष्काळी गावे टॅंकरमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान सुरू केले गेले. अभियान यशस्वी करण्याची कृषी विभागावर प्रमुख जबाबदारी असली, तरी शासनाच्या इतर योजनांवरही कामे करण्याची जबाबदारी सोपवली आहे.
गेल्या दोन वर्षांत पाणी अडवून ते जिरवण्यावर भर देत लोकसहभागातून गाळ काढण्यासह अन्य कामांना या योजनेत प्राधान्य दिले गेले. दोन वर्षांनंतर या कामाचे प्रभावी परिणाम दिसू लागले आहेत. योजनेतून राज्यात सर्वाधिक तलावातील गाळ नगर जिल्ह्यामध्ये काढला गेला आहे.
यंदा भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार दहा मीटरवर गेलेली पाणीपातळी आता सात मीटरने वर आली आहे. दोन वर्षांपूर्वी जेवढा पाऊस झाला होता, तेवढाच पाऊस यंदाही झालेला आहे. मात्र, यंदा पाणी अडवल्याचे प्रमाण अधिक असल्याने पाणीपातळी उंचावण्याला मदत झाल्याचे सांगण्यात आले आहे.
असे असले तरी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामात जिल्हा परिषेदचा फारसा सहभाग तीन वर्षांच्या काळात दिसला नाही. ग्रामीण भागाच्या विकासाची जबाबदारी जिल्हा परिषदेवर आहे. मात्र, जलयुक्त शिवार योजनेबाबत फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणात अभियानातून कामाचे नियोजन केले आहे. जलयुक्त शिवार अभियानात निवडलेल्या २४१ गावांत २५७ दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.
या कामांवर सुमारे १४ कोटी ३२ लाख २६ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. या दुरुस्तीच्या कामामुळे २३ हजार ९३९ टीसीएम पाणीसाठा होईल. दुरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे, उपाध्यक्ष राजश्री घुले, सभापती अनुराधा नागवडे, कैलास वाकचौरे, अजय फटांगरे, उमेश परहर, मुख्यकार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांनी पुढाकार घेतला आहे.