संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नांदेड, हिंगोलीत मूग, उडीद खरेदीला सुरवात

परभणी : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर शनिवार(ता.२८)पर्यंत १५० शेतकऱ्यांचा ७८० क्विंटल ५० किलो मूग आणि उडीद खरेदी करण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यात मात्र मूग, उडिदाची खरेदी झाली नाही. आर्द्रतचे प्रमाण १२ टक्के पेक्षा अधिक येत असल्यामुळे तीनही जिल्ह्यांमध्ये अद्याप सोयाबीनची खरेदी होऊ शकली नाही.

दरम्यान, जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे खरेदी केंद्र कार्यान्वित करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हमीभावाने मूग, उडीद खरेदी करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात धर्माबाद, बिलोली, देगलूर या ठिकाणी, परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत,गंगाखेड, पूर्णा या ठिकाणी, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, जवळा-बाजार असे तीन जिल्ह्यांत एकूण १२ खरेंद्री केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. या केंद्रांवर मुगाची ५,५७५ रुपये प्रतिक्विंटल, उडिदाची ५,४०० रुपये प्रतिक्विंटल हमीदराने खरेदी केली जात आहे.

शनिवार (ता.२८) पर्यंत नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर ४१ शेतकऱ्यांचा २१० क्विंटल मूग आणि १०९ शेतकऱ्यांचा ५७० क्विंटल ५० किलो उडीद अशा एकूण १५० शेतकऱ्यांचा ७८० क्विंटल ५० किलो मूग, उडीद खरेदी करण्यात आला आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील केंद्रावर १ शेतकऱ्याचा ४ क्विंटल ५० किलो मूग खरेदी करण्यात आला आहे.

धर्माबाद येथील केंद्रावर २ शेतकऱ्यांचा ३१ क्विंटल ५० किलो, बिलोली केंद्रावर ३ शेतकऱ्यांचा २९ क्विंटल ५० किलो असा एकूण ५ शेतकऱ्यांचा ६१ क्विंटल उडीद खरेदी करण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यातील दोन केंद्रांवर ४० शेतकऱ्यांच्या २०५ क्विंटल ५० किलो मुगाची खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये हिंगोली केंद्रावर ३१ शेतकऱ्यांचा १६८ क्विंटल आणि वसमत येथील केंद्रावर ९ शेतकऱ्यांच्या ३१ क्विंटल मुगाचा समावेश आहे. हिंगोली येथील केंद्रावर १०४ शेतकऱ्यांच्या ५०९ क्विंटल ५० किलो उडीद खरेदी करण्यात आला आहे.

परभणी जिल्ह्यातील सहा खरेदी केंद्रांवर मूग, उडीद खरेदीस शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नाही. सोयाबीनमधील आर्द्रतेचे प्रमाण १४ ते १८ टक्के येत असल्यामुळे तीनही जिल्ह्यातील केंद्रांवर अद्याप सोयाबीन खरेदी झाली नाही.

दरम्यान, परभणी जिल्ह्यातील परभणी येथे ७७ शेतकऱ्यांनी, जिंतूर १२५, सेलू १८०, मानवत २००, गंगाखेड १०, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली येथे ६०० शेतकऱ्यांनी, वसमत येथे १५०, जवळा बाजार येथे १२५ शेतकऱ्यांनी मूग, उडीद, सोयाबीन विक्रासाठी नोंदणी केल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली.

उत्पादकतेचा अडसर आॅनलाइन नोंदणीसाठी पीक पेरा प्रमाणपत्रासोबतच सरासरी पीक उत्पादकतेमुळे अडचणी येत आहेत. पीक कापणीनंतर कृषी विभागाने सादर केलेल्या सरासरी पीक उत्पादकतेच्या आकडेवारीच्या मर्यादेत मूग, उडीद, सोयाबीनची खरेदी केली जात आहे. परंतु यामुळे सरासरी उत्पादनापेक्षा अधिक उत्पादन मिळालेल्या शेतकऱ्यांची गोची होत आहे. परिमाणी अनेक शेतकरी खुल्या बाजारात कमी दराने विक्री करत आहेत.

केंद्र वाढविण्याची मागणी नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाहतूकीच्या दृष्टीने सोयीचे व्हावे यासाठी सोयाबीन खरेदीसाठी तीन जिल्ह्यांत १७ खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. परंतु गावाच्या जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केंद्र नसल्यामुळे वाहतुकीसाठी शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे जवळच्या बाजार समितीमध्ये सोयाबीन केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com