नांदेड, परभणी, हिंगोलीत तुरीचे ९३ कोटींचे चुकारे अदा

नांदेड, परभणी, हिंगोलीत तुरीचे ९३ कोटींचे चुकारे अदा
नांदेड, परभणी, हिंगोलीत तुरीचे ९३ कोटींचे चुकारे अदा

नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १५ हजार ६२५ शेतकऱ्यांना तुरीचे ९३ कोटी ८१ लाख ९७ हजार ९४० रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले आहेत. अद्याप १३ हजार ४४८ शेतकऱ्यांचे ९४ कोटी २८ लाख ८० हजार रुपयांचे चुकारे अडकलेले आहेत. गुरुवार (ता. ७)पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर चुकारे जमा करण्याचे आदेश असल्यामुळे हे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, आॅनलाइन नोंदणी केलेल्या, परंतु तूर खरेदी न केलेल्या तीन जिल्ह्यांतील ३३ हजार ९६ शेतकरी `भावांतर` योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणार आहेत. हरभरा खरेदी परत सुरू करण्याचे आदेश बुधवारी (ता. ६) दुपारपर्यंत प्राप्त झाले नव्हते. नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांत १५ मेपर्यंत नोंदणी केलेल्या ६२ हजार १६८ शेतकऱ्यांपैकी २९ हजार ७२ शेतकऱ्यांची ३ लाख ४५ हजार १५२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. सोमवार (ता. ४)पर्यंत यापैकी १५ हजार ६२४ शेतकऱ्यांना ९३ कोटी ८१ लाख ९७ हजार ९४० रुपये एवढ्या रक्कमेचे चुकारे अदा करण्यात आले आहेत.

यामध्ये नांदेड जिल्ह्यातील १० हजार ७७० शेतकऱ्यांना ५४ कोटी २९ लाख २२ हजार रुपये, परभणी जिल्ह्यातील १ हजार ९३१ शेतकऱ्यांना २२ कोटी २८ लाख ६२ हजार ६१४ रुपये, हिंगोली जिल्ह्यातील २ हजार ९२३ शेतकऱ्यांना १६ कोटी ८१ लाख ९७ हजार ९४० रुपये यांचा समावेश आहे. अजून या तीन जिल्ह्यांतील १३ हजार ४४८ शेतकऱ्यांचे ९४ कोटी २८ लाख ८० हजार ४६० रुपयांचे चुकारे अडकलेले आहेत. तीन जिल्ह्यांतील खरेदी केंद्रावर ४१ हजार क्विंटल तूर आणि हरभरा पडून आहे. त्यामुळे तूर तसेच हरभऱ्याचे चुकारे अद्याप अडकलेलेच आहेत.

३३ हजार शेतकरी ‘भावांतर’साठी पात्र या तीन जिल्ह्यांतील खरेदी केंद्रावर आॅनलान नोंदणी केलेल्यांपैकी ३३ हजार ९६ शेतकऱ्यांची तूर खरेदी झालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या भावांतर योजनेच्या लाभासाठी हे शेतकरी पात्र ठरणार आहेत.

हरभरा खरेदीचे आदेश पोचले नाहीत हरभरा खरेदीसाठी १३ जूनपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु बुधवारी (ता. ६) दुपारपर्यंत खरेदी सुरू करण्याचे आदेश प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे खरेदी सुरू होऊ शकली नाही. तीन जिल्ह्यांतील नोंदणी केलेल्या २८ हजार ४१९ शेतकऱ्यांच्या हरभऱ्याचे मोजमाप राहिले आहे. खरेदी सुरू झाली तरी १३ जूनपर्यंत जेमतेम एक हजार ते दीड हजार शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची खरेदी होऊ शकेल. २५ हजारहून अधिक शेतकरी शिल्लक राहतील. या शेतकऱ्यांनादेखील `भावांतर` योजनेचा लाभ द्यावा लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com