नवी दिल्ली ः शेतकरी अनेक समस्यांना तोंड देत आहेत. शेतकऱ्यांकडील शेतमाल खरेदी- विक्रीसाठी यंत्रणा उभारण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा किरकोळ दरात खरेदी करावी लागतात. तर त्यांना आपला शेतमाल घाऊक दरात विकावा लागतो. ही विपणन यंत्रणा बदलता येऊ शकते. जर कृषी निविष्ठा घाऊक दरात खरेदी करून त्यांना आपला शेतमाल किरकोळ दरात विकला तर त्यांची मध्यस्थांकडून लूट होणार नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
ते महाराष्ट्रातील सहकारी चळवळीतील नेते लक्ष्मण माधव राव इनामदार यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात बोलत होते. या वेळी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह, राज्यमंत्री कृष्ण राज, गजेंद्र सिंह शेखावत आदी उपस्थित होते. या वेळी इनामदार यांच्यावरील दोन पुस्तकांचे प्रकाशन पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते झाले.
शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी शेतीला जोडधंदा म्हणून मधमाशीपालन व्यवसायाकडे वळायला हवे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी म्हटले.
त्यांनी सहकारी क्षेत्र मजबूत करण्याची गरज व्यक्त केली. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढेल, याकडे लक्ष द्यायला हवे. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी काम करणाऱ्या सहकारी संस्थांची उभारणी करायला हवी, असेही त्यांनी नमूद केले.