हिंगोली : जिल्ह्यात हळद या नगदी पिकाखालील क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे. परंतु जिल्ह्यात हळदीवर प्रक्रिया करणाऱ्या मोठ्या क्षमतेच्या उद्योगांची वानवा आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून हळदीपासून विविध प्रक्रिया पदार्थांची निर्मिती करणारे उद्योग सुरू झाले तर मूल्यवर्धन होऊन शेतकऱ्यांचा फायदा होईल. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. त्याअनुषंगाने लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय स्तरावरून प्रयत्न करणे आवश्यक आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये हळद प्रक्रिया उद्योगासाठी निधीची तरतूद करण्याची गरज आहे.
अन्य पिकांच्या तुलनेत किफातशीर उत्पादन मिळत असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सर्व पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांचा हळद पिकाकडे कल वाढला आहे.जिल्ह्यात दरवर्षी सरासरी २५ हजार हेक्टरवर हळदीची लागवड केली जाते. काही वर्षांपूर्वी केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला वसमत तालुका आता हळद लागवड आणि उत्पादनात जिल्ह्यात आघाडीवर आहे.
त्यापाठोपाठ कळमनुरी, हिंगोली, औंढा नागनाथ, सेनगांव या तालुक्यांतील शेतकरी मोठ्या प्रमाणावर हळद लागवड करत आहेत. सुधारित लागवड पद्धत, योग्य व्यवस्थापनातून अनेक शेतकरी एकरी २५ ते ३० क्विंटलपर्यंत हळकुंडाचे उत्पादन घेत आहेत.
हिंगोली आणि वसमत येथे हळदीच्या बाजारपेठा विकसित झाल्या आहेत. या ठिकाणाहून देशभरातील मसाले उद्योगासह अन्य उद्योगांना हळद पुरवठा केला जातो. वसमत येथे हळदीपासून कुरकुमीन काढण्याचा प्लाॅन्ट आहे. काही ठिकाणी पाॅलिशिंग, ग्रेडिंग, हळद पावडर निर्मितीचे छोटे उद्योग आहेत परंतु मोठ्या प्रमाणावर हळद पावडर तसेच अन्य प्रक्रिया पदार्थांची निर्मिती करणाऱ्या उद्योगाची मात्र वानवा आहे. हळदीपासून हळद पावडरीसह विविध प्रक्रिया पदार्थ तयार करणारे उद्योग सुरू करण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पात निधीची तरतूद करणे आवश्यक आहे.
हिंगोली, नांदेड जिल्ह्यात हळदीचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे हळदीपासून प्रक्रिया पदार्थ निर्मिती करणाऱ्या मोठ्या उद्योग उभारणीची क्षमता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठातील अन्नतंत्र महाविद्यालयामध्ये ओल्या हळदीपासून कॅन्डी, ज्युस, आईस्क्रिम, लोणचे आदी प्रक्रिया पदार्थाच्या निर्मितीवर संशोधन सुरू आहे.
अकोला येथील डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ओल्या हळदीपासून थेट हळद पावडर निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामुळे हळदीचे मूल्यवर्धन होऊन शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे, असे अन्नतंत्र महाविद्यालयातील प्रा. राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गंत जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना झालेली आहे. हळद उत्पादक शेतकरी कंपन्यांचे सभासद आहेत. प्रक्रिया उद्योगामुळे शेतकऱ्यांचा जास्त फायदा होऊ शकतो.
हळदीपावडर सह विविध प्रक्रिया पदार्थ निर्मिती उद्योग उभारणीसाठी शासनाने शेतकरी उत्पादक कंपन्यांना आर्थिक पाठबळ देणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी कुरकुमीनचे प्रमाण अधिक असलेल्या हळदीच्या वाणांची लागवडदेखील करणे आवश्यक आहे, असे सूर्या फार्मर्स प्रोड्युर्स कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद बोरगड यांनी सांगितले.