नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल मंदावलेलीच !

नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीला संधी खूप आहे. मात्र त्यासाठी संस्थात्मक पातळीवर तसेच शासनाच्या पातळीवर एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. सेंद्रियचे ब्रॅंडिंग आणि मार्केटिंगवर भर देण्याची गरज आहे. आम्ही ‘मॉर्फा' या संस्थेच्या माध्यमातून तसे प्रयत्न सुरु केले आहे. राज्यात नाशिक, सोलापूर, सांगली व पुणे येथे यादृष्टीने ‘मॉल' सुरू करण्यात येणार आहेत. - योगेश रायते, संचालक, महाराष्ट्र ऑरगेनिक अँड रेसिड्यू फ्री असोसिएशन (मॉर्फा)
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल मंदावलेलीच !
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल मंदावलेलीच !

नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी ३६ गट तयार झाले. त्यात अजून १८ गटांची नव्याने भर पडली आहे. कृषी विभागाने गटनिर्मितीचे सोपस्कार पार पाडले असले, तरी या गटांची वाटचाल अद्याप तरी संथच सुरू असल्याचे वास्तव आहे. काही बाजारात सेंद्रियच्या नावाखाली काही गटांकडून शेतीमालाची विक्री होत असली, तरी त्यात पूर्णपणे सेंद्रिय शेतीमालच विकला जात आहे का, याबाबतही शंका उपस्थित केल्या जात आहेत.

एकंदर नाशिक जिल्ह्यातील सेंद्रिय शेती गोंधळाच्या स्थितीत सापडलेली असताना सेंद्रिय शेतीत काम करणाऱ्या संस्था आणि कृषी विभागाने शास्त्रशुद्ध सेंद्रिय शेतीवर भर देताना सेंद्रिय शेतीमालासाठी एकत्रित मार्केटिंगची व्यवस्था उभारावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

नाशिक जिल्ह्यात १९०० एकरावर सेंद्रिय शेती केली जात असून, चालू वर्षी त्यात पुन्हा ६०० एकरांची भर पडली अाहे. ही आकडेवारी आता २५०० एकरावर पोचली असल्याचे सांगितले जात आहे. यात स्वयंस्फूर्तीने सेंद्रिय शेतीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तरीही अत्यल्प असल्याचेच चित्र गाव पातळीवर दिसते. बहुतांश भागांत सेंद्रिय शेती गट हे केवळ नावापुरतेच उभारले असून, त्या माध्यमातून सेंद्रिय शेतीमालाची लागवड ते विक्री अशी व्यवस्था अद्याप उभी राहू शकली नाही.

सेंद्रिय मालाची मुंबईमध्ये विक्री

नाशिक जिल्ह्यातील कश्‍यप ग्रुप, संपूर्णा ग्रुप या गटांतील शेतकऱ्यांनी सेंद्रिय माल विक्रीसाठी मुंबईत बाजार सुरू केले आहेत. आठवड्यातून काही दिवस हा भाजीपाला मुंबईतील प्रतिष्ठित भागात विकला जातो. या बाजाराला मुंबईतील स्थानिक ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. हा एक यशस्वी प्रयोग वगळता जिल्ह्यातील बहुतांश गट मात्र अद्याप मार्केटिंगच्या पातळीपर्यंतही पोचलेले नाहीत.

मजबूत व्यवस्थेची गरज

मालेगाव येथील सेंद्रिय शेतीच्या चळवळीत काम करणारे प्रयोगशील शेतकरी महेश पवार म्हणाले, की नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीसाठी संधी अमाप आहे. मात्र शास्त्रशुद्ध सेंद्रिय शेतीच्या तत्त्वांसाठी फारसा आग्रह धरताना दिसत नाही. सेंद्रिय म्हणून जे विकले जाते ते शंभर टक्के सेंद्रिय आहे की नाही, याबाबत कुणी विचारणा करीत नाही. नमुना तपासणी, प्रमाणिकरण याबाबीतही अजून खूप प्राथमिक अवस्थेत काम सुरू आहे. एकंदरीत गोंधळाची स्थिती जास्त आहे. यासाठी सेंद्रिय शेतीत काम करणाऱ्या संस्था आणि शासनाच्या कृषी विभागाने याबाबत संपूर्ण मार्गदर्शन करणारा प्लॅटफॉर्म उभा करावा व सेंद्रिय शेतीमालाच्या नमुना तपासणी, प्रमाणिकरणापासून ते मार्केटिंगपर्यंत कामांसाठी मजबूत व्यवस्था उभी करणे आवश्‍यक आहे.

प्रमाणिकरणावर भर

नाशिक जिल्ह्यात ५४ गटांच्या माध्यमातून जवळपास २५०० एकरांपर्यंत सेंद्रिय शेतीचे प्रयोग पोचले आहेत. येत्या काळात प्रमाणिकरणावर भर देण्यात येणार आहे. नाशिक विभागात त्या त्या भागातील वैशिष्ट्यपूर्ण शेतीमालाचे ब्रॅंडिंग केले जाणार आहे. यातून सेंद्रिय शेतीची चळवळ अधिक गतिमान होईल. - डॉ. संजीव पडवळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नाशिक.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com