गिरणा धरणाच्या आवर्तनाचा जळगाव, धरणगावला लाभ नाहीच

पाणी आवर्तन
पाणी आवर्तन
जळगाव  ः जिल्ह्यातील भडगाव, चाळीसगाव, पाचोरा, धरणगाव व जळगाव आदी तालुक्‍यांची जीवनवाहिनी असलेल्या गिरणा धरणातून बुधवारी (ता.४) पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले. हे आवर्तन फक्त पाचोरापर्यंत येईल. पुढे जळगाव, धरणगाव या तालुक्‍यांमधील गावांना त्याचा फारसा लाभ होणार नाही, अशी स्थिती आहे. 
 
गिरणाचे आवर्तन या नदीच्या शेवटच्या टप्प्यातील कानळदा, नांद्रा बुद्रुक, चांदसर आदी गावांपर्यंत पोचतच नाही. फक्त पाचोरापर्यंत पाणी येते. पावसाळ्यातही जेमतेम प्रवाही पाणी येते. यामुळे गिरणा नदीच्या शेवटच्या टप्प्यातील गावांमध्ये पाणीटंचाई वाढू लागली आहे. कारण मागील आठ ते दहा वर्षे पाणी अडविण्याची, जिरविण्याची कोणतीही व्यवस्था कानळदा, नांद्रा भागात केली नाही.
 
आजघडीला शिरसोलीपासून चांदसरपर्यंतच्या भागात उन्हाळ्यात कूपनलिकांना उन्हाळ्यात पाणी नसते. केळीची शेती अडचणीत आली आहे. या भागात काळी कसदार शेती आहे. परंतु, कूपनलिका आटल्या आहेत. काही शेतकऱ्यांचा अपवाद वगळला तर पुरेसे पाणी नसते. फेब्रुवारीतच पाणी कमी होते. 
 
सुमारे १० ते १२ हजार हेक्‍टर क्षेत्र कोरडे झाले आहे. मार्चपर्यंतच मका, गहू आदी पिके कूपनलिकाधारक शेतकरी घेतात. ऊस, केळी व इतर संरक्षित शेतीची पिके शेतकरी घेऊ शकत नाहीत. शेतीची जशी अवस्था बिकट आहे. तशी पिण्याच्या पाण्याचीही समस्या आहे. दोन दिवसाआड पाणी गिरणा नदीकाठावरील गावांना मिळते. शिरसोली, कानळदा व इतर मोठ्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या वाढत आहेत.
 
लोकसंख्या वाढत असल्याने त्याचा ताणही वाढू लागला आहे. ही बाब लक्षात घेता गिरणा नदीकाठच्या अंतिम भागात चांगला बंधारा उभारावा व गिरणा आवर्तनाचे पाणी या भागापर्यंत दरवर्षी मार्च व एप्रिल महिन्यात किमान दोनदा सोडले जावे, अशी मागणी केली जात आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com