जळगाव ः जिल्ह्यातील सर्वात मोठी व राजकीयदृष्ट्या अनेक घडामोडींचा बिंदू असलेल्या जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश आनंदा नारखेडे यांच्याविरुद्ध १३ संचालकांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. या संदर्भात सोमवारी (ता.२३) सकाळी जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांना पत्र देण्यात आले.
या वेळी बाजार समितीचे उपसभापती कैलास चौधरी, संचालक सिंधूबाई पाटील, सरला मच्छिंद्र पाटील, प्रशांत अरविंद पाटील, शशिकांत बियाणी, नितीन बेहेडे, अनिल भोळे आदी उपस्थित होते.
बाजार समितीमध्ये एकूण १८ संचालक निवडून आले असून, यातील भरत धनाजी पाटील यांचे निधन झाल्याने त्यांची जागा रिक्त आहे. आता १७ संचालक असून, ते अविश्वास प्रस्तावावर मतदान करतील. मतदान जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार होईल. या आठवड्यात मतदान होईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
बाजार समितीची निवडणूक १ सप्टेंबर २०१५ रोजी झाली होती. १५ सप्टेंबर २०१५ ला सभापती व उपसभापती यांची निवड झाली. सभापतिपदी भाजपचे प्रकाश आनंदा नारखेडे; तर उपसभापतिपदी कैलास चौधरी यांची निवड झाली होती.
दोन वर्षे कारकीर्द पूर्ण होऊनही राजीनामा नाही
बाजार समितीमध्ये एक वर्षानंतर दुसऱ्या संचालकाला सभापतिपदाची संधी दिली जाईल, असा निर्णय झाला होता. भाजप, शिवसेना व कॉंग्रेसने एकत्र निवडणूक लढली होती. परंतु सभापती नारखेडे यांनी आपली कारकीर्द दोन वर्षे पूर्ण होऊनही राजीनामा दिला नाही. त्यामुळे काही संचालक नाराज झाले होते. या संचालकांनी अखेर सुरेश जैन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात एकत्र येऊन हा अविश्वास प्रस्ताव दाखल केला.
तेरा संचालकांच्या प्रस्तावावर सह्या
अविश्वास प्रस्तावार सह्या करणाऱ्या सदस्यांमध्ये उपसभापती कैलास चौधरी, भरत बोरसे, सुरेश श्यामराव पाटील, मनोहर पाटील, शशिकांत बियाणी, नितीन बेहेडे, लक्ष्मण पाटील, प्रशांत अरविंद पाटील, अनिल बारसू भोळे, सरला पाटील, सिंधूबाई पाटील, संगीता सपकाळे, वसंत भालेराव यांचा समावेश अाहे.
लक्ष्मण पाटील होणार सभापती
बाजार समितीचे पुढचे सभापती लक्ष्मण गंगाराम पाटील हे असतील, असा निर्णय सुरेश जैन, राज्यमंत्री पाटील यांनी घेतला आहे; तर उपसभापती पुढील काळात दर सहा महिन्यांनी बदलले जातील, असे जैन गटाकडून कळते.