कपाशी काढणाऱ्यांच्या ‘सर्व्हे’चे काय?

कपाशी काढणाऱ्यांच्या ‘सर्व्हे’चे काय?
कपाशी काढणाऱ्यांच्या ‘सर्व्हे’चे काय?

अकोला : गुलाबी बोंडअळीमुळे कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अाहे. याचा गेल्या तीन दिवसांपासून यंत्रणांकडून संयुक्त पंचनामा केला जात अाहे. या सर्वेक्षणासाठी आज(सोमवार, ता. १८)पर्यंत डेडलाइन देण्यात अाली अाहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच कपाशीचे पीक उपटून टाकले त्यांच्या पीक नुकसानीचा सर्व्हे केला जात नसल्याने असे असंख्य शेतकरी अडचणीत आले आहेत.

पंचनामा करणारी पथके सध्या उभ्या असलेल्या कपाशीच्या क्षेत्रात जाऊन छायाचित्र घेत अाहेत. पंचनामा करणाऱ्या यंत्रणांकडे कपाशी उपटलेल्या शेतकऱ्यांबाबत कुठलेही ठोस निर्देश किंवा सूचना नसल्याची माहिती समोर अाली अाहे. त्यामुळे या हंगामात ज्यांनी कपाशीची लागवड केली व सातबाऱ्यावर नोंद अाहे अशा शेतकऱ्यांचा समावेश करण्याची मागणी समोर अाली अाहे.

शासनाने सर्वेक्षण करताना कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, सरपंच यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्याच्या सूचना दिल्यानंतर तीन दिवसांपासून यंत्रणा शेतशिवारात दिसून येत अाहे. यावेळी ही पथके बांधावर जाऊन छायाचित्रांसह माहिती घेत अाहेत. मात्र अनेक शेतकऱ्यांनी पिकाचे नुकसान पाहता दुसरे पीक घेण्यासाठी कपाशी उपटली. अाता त्या जागी गहू, हरभऱ्याची लागवड केली अाहे. अशा शेतकऱ्यांचे सध्या सर्व्हे केले जात नसल्याचे समोर अाले अाहे.

कृषी, महसूल, पंचायत विभागाच्या कर्मचाऱ्यांना सोमवारपर्यंत हा सर्व्हे पूर्ण करायचा अाहे. त्यातही एका दिवसात जास्तीत जास्त ५० शेतकऱ्यांच्या बांधावर ही पथके पोचत अाहेत. कपाशीचे लाखो हेक्टर क्षेत्र बोंडअळीने बाधित झालेले असून प्रत्येक शेतात नुकसानीची पातळी ३३ टक्क्यांवर असल्याचे दिसून येत अाहे. एकूणच संपूर्ण कपाशीचे पीक बोंडअळी व किडीने पोखरले असून सर्वेक्षण करणारी यंत्रणासुद्धा ही वास्तविकता पाहून हादरली अाहे. त्यामुळेच सध्या उभ्या असलेल्या पिकाची दखल घेतानाच उपटून टाकलेल्या कपाशी पीक क्षेत्राची नोंद घेण्याची मागणी केली जात अाहे. तलाठ्यांनी अाॅगस्टमध्ये पीक पेऱ्याच्या नोंदी केलेल्या असून त्याचा अाधार यावेळी घेण्याची गरज व्यक्त केली जाऊ लागली अाहे.

डेडलाइन पाळणे अशक्यच संयुक्त पंचनामा करताना कृषी विभागाचा फिल्डवरील कर्मचारी असलेला कृषी सहायक महत्त्वाचा घटक अाहे. परंतु प्रत्येक जिल्ह्यात कृषी सहायकाकडे किमान अाठ ते दहा गावांचा कारभार असून हजारो हेक्टर क्षेत्र अाहे. तर एवढ्याच गावात तीन ते चार तलाठी व तेवढेच ग्रामसेवक असतात. अशावेळी एकट्या कृषी सहायकाची सर्व ठिकाणी हजेरी लागणे अशक्य झालेले अाहे. शिवाय काही ठिकाणी कृषी सहायकालाच पथकप्रमुख बनविण्यात अालेले अाहे. येत्या सोमवारपर्यंत कृषी विभागाच्या नमुन्यात माहिती सादर करण्याची मुदत असून ती डेडलाइन पाळण्यासाठी अाता नवनवीन युक्त्या समोर येऊ लागल्या अाहेत. एकाच जागेवर बसून माहिती भरण्याचे प्रकारही सुरू झाले अाहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com