शेतमालाची ‘हमी’ घेईना कोणी

शेतमालाची ‘हमी’ घेईना ‘कोणी’
शेतमालाची ‘हमी’ घेईना ‘कोणी’

लातूर : सोयाबीन, मूग, उडीद आदी शेतमाल हमी भावाप्रमाणेच खरेदी करावा, असे आदेश शासनाने दिले आहेत. पण सध्या अडत बाजारात शेतमालाचे भाव पडलेले आहेत. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत अडत बाजारात सोमवारी (ता. ३०) झेंडा फिरवण्यात आला. पण सौदाच निघाला नाही. जिल्ह्यातील अकरा बाजार समित्यांची अशीच परिस्थिती आहे. शासनाची खरेदी केंद्र नावालाच सुरू झाली आहेत. पण त्याचा उपयोग होत नाही. शेतमालाची ‘हमी’ घेईना ‘कोणी’ अशी परिस्थिती निर्माण झाली असून, एक लाख क्विंटलपेक्षा जास्त शेतमाल पडून राहिला. यात सोयाबीन मोठ्या प्रमाणात आहे.

सोयाबीन, मूग, उडदाची हमी भावानेच खरेदी करावी अन्यथा कारवाई करण्याचा इशारा जिल्हा उपनिबंधकांनी एका पत्राद्वारे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांना दिला आहे. या समित्यांनी त्याची अंमलबजावणी सुरू करताच सोमवारी शेतमालाचा सौदाच निघाला नाही. बाजारच बंद राहिला. एक लाख क्विंटलपेक्षा जास्त शेतमाल पडून राहिला आहे. त्याचा मोठा परिणाम लातूर बाजार समितीवर झाला आहे. येथील अडत बाजारात रोज तीस हजार क्विंटलपेक्षा जास्त आवक सोयाबीनची आहे. सध्याच्या वातावरणामुळे सोयाबीनमध्ये आर्द्रताही जास्त आहे. त्यामुळे सोयाबीनला सध्या सरासरी दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटलला भाव आहे.

मूग व उडदाची आवक कमी आहे. पण त्यालाही हमी भावापेक्षा कमी भावच मिळत आहे. पण शासनाने हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी होऊ देऊ नये, असे आदेश दिल्याने बाजार समितीत शेतमालाचा सौदाच निघाला नाही. व्यापाऱयांचा एक प्रकारे अघोषित बंदच राहिला. याचा परिणाम एकाच दिवशी एकट्या लातूर बाजार समितीच्या आवारात ५० हजार क्विंटल तर इतर बाजार समित्यांत ५० हजार क्विंटल असा एकूण एक लाख क्विंटलपेक्षा जास्त शेतमाल पडून राहिला आहे. यातून दहा कोटींपेक्षा अधिकचे व्यवहार ठप्प राहिले आहेत.

शासनाच्या वतीने लातूर व उदगीर येथे हमी भावाप्रमाणे आॅनलाईन खरेदी केंद्र सुरु केली आहेत. त्यात अनेक अडचणीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापर्यंत एक क्विंटलही खरेदी या केंद्रावर झालेली नाही. त्यात बाजार बंद पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाची हमी ना शासन घेईना ना व्यापारी घेईना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

फरकाची रक्कमच द्यावी या वर्षी सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. एकट्या लातूर बाजार समितीत दरवर्षी आक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत किमान पाच लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी-विक्री होते. शासनाच्या खरेदी केंद्रावर ऐवढ्या मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे खरेदी करणे अशक्य आहे. त्यामुळे शासनाने बाजार भाव व हमी भावातील फरकाची रक्कम देऊनच शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com