जळगाव ः राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या कृषी यांत्रिकीकरण योजनेसंबंधी जिल्ह्यास पाच कोटी ४० लाख ७१ हजार रुपयांचा निधी मंजूर आहे. पैकी चार कोटी ५१ लाख निधी प्राप्त झाला असून, उर्वरित ९० लाख रुपये निधीची प्रतीक्षा आहे. प्राप्त निधीपैकी निम्माच म्हणजेच दोन कोटी चार लाख निधी खर्च झाला असून, उर्वरित निधीसंबंधी प्रस्ताव प्राप्त झालेले नाहीत. ट्रॅक्टर खरेदीसही हवा तसा प्रतिसाद नसल्याने त्यासंदर्भातील प्रस्ताव हव्या तेवढ्या संख्येने प्राप्त झालेले नसल्याची माहिती आहे.
या योजनेतून खुल्या प्रवर्गातील व्यक्तींना ४० टक्के अनुदान मिळते. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्ती किंवा शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान दिले जाते. परंतु यंदा मोठे व छोटे, असे सर्वच शेतकरी हवा तसा पाऊस न झाल्याने अडचणीत सापडले आहेत.
दसरा, नवरात्रोत्सवात अनेक शेतकरी ट्रॅक्टरची खरेदी करायचे, परंतु यंदा कपाशीचे पीक हवे तसे सजले नाही. तर केळीलाही अपेक्षित दर नाहीत. पुढे रब्बी हंगामाबाबतही प्रश्नचिन्ह आहे. अशा स्थितीमध्ये ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारांच्या खरेदीला प्रतिसाद नाही. त्यामुळे जेवढे प्रस्ताव अपेक्षित होते, तेवढे आलेले नसल्याची माहिती मिळाली.
कृषी विभागात प्रस्ताव स्वीकारले जात असून, उर्वरित निधी लवकर खर्च व्हावा यासाठी तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासंदर्भातील नियोजन सुरू असून, काही प्राप्त प्रस्तावांची छाननी करून ते लागलीच मार्गी लावले जात असल्याची माहिती मिळाली.