जरंडीत ‘एक गाव, एक वाण’ योजना फसली

जिनर्स खरेदी करतील या अपेक्षेने कापूस विकला नाही. शेतकऱ्यांना गरज भागविण्याकरिता क्‍विंटलप्रमाणे १ हजार रुपये बचत गटातून कमी व्याजदराने दिले. २५ लाख रुपयांचे वाटप जानेवारीत करण्यात आले. परंतु पदरी निराशाच पडली. सिल्लोडला कापूस आणण्याचे जिनर्सकडून सांगण्यात आले होते. ७० किलोमीटरचा वाहतूक खर्च, हमाली याचा विचार करता १० टक्‍के जास्त मिळूनही उपयोग झाला नसता. - दिलीप पाटील, शेतकरी, जरंडी, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद
जरंडीत ‘एक गाव, एक वाण’ योजना फसली
जरंडीत ‘एक गाव, एक वाण’ योजना फसली

नागपूर ः कापसाचे एक गाव एक वाण लावण्याचा आदर्श सांगणाऱ्या जरंडी (ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) येथील शेतकऱ्यांना उत्पादनानंतर मात्र विक्रीसाठी जंगजंग पछाडावे लागल्याने पांढरे सोने काळवंडले. परिणामी हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी अखेरीस बाजार दराने जामनरेच्या व्यापाऱ्याला कापूस विकून आपली देणी भागविली. राज्याला दिशा देणारा हा पहिलावहिला प्रयोगच फसल्याने यामुळे शासनाच्या धोरणावरही साशंकता व्यक्‍त केली जात आहे.  एक गाव एक वाण या विषयावर ९ एप्रिल २०१८ जिनर्स असोसिएशनच्या बैठकीत मंथन झाले. एकच वाण असेल तर बाजार दरापेक्षा १० टक्‍के जास्त परताव्यावर बैठकीत चर्चा झाली. मराठवाड्याच्या औरंगाबाद जिल्ह्यातील जरंडी गावाने या दिशादर्शक उपक्रमासाठी सकारात्मकता दर्शविली. जरंडीचे दिलीप आणि गोपाल पाटील यांच्या नेतृत्वात ४० शेतकऱ्यांनी या महत्त्वाकांक्षी आणि राज्याला दिशादर्शक असा उपक्रमात सहभागी होण्याचा ठरविले. त्यानुसार एक गाव एक वाणअंतर्गत ३०० एकरांवर लागवड करण्यात आली. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी अकोला कृषी विद्यापीठात राज्यभरातील जिनर्सच्या झालेल्या बैठकीत जरंडी गावातील शेतकऱ्यांच्या उपक्रमशीलतेचे विशेष कौतुक केले. या बैठकीला जरंडीचे शेतकरी दिलीप पाटील व इतरांनाही निमंत्रित करण्यात आले होते.  कापसाच्या विक्रीपूर्वी ज्येष्ठ कापूसतज्ज्ञ गोविंद वैराळे यांच्या पुढाकाराने नागपुरातील सिरकॉट संस्थेत जरंडी गावात उत्पादित कापसातील रुईचे प्रमाण तपासण्यात आले. सहा ऑक्‍टोबरला दहा नमुने तपासले गेले. जानेवारीत पुन्हा कापूस नमुन्यांची तपासणी एरंडोल, धरणगाव, सिल्लोड येथे करण्यात आली. कापसात क्‍विंटलला ३४ किलो रुई, ६४ किलो सरकी, २ किलो वेस्ट असे सरासरी प्रमाण राहते. परंतु जरंडी गावातील कापसात सर्वाधिक ३७ ते ३९ किलो रुईचे प्रमाण मिळून आले, असे असतानाही जिनिंग व्यावसायिकांकडून येथील शेतकऱ्यांना अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. हंगाम संपत आला असतानाही दहा टक्‍के वाढीव दर मिळत नसल्याचे पाहून संयम सुटलेल्या शेतकऱ्यांनी अखेरीस ६२०० रुपये क्‍विंटल दराने जामनेर येथील व्यापाऱ्याला २००० क्‍विंटल कापसाची विक्री केली. या संदर्भात राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर बोलण्याचे टाळले.  असे आहे जरंडी जरंडी गाव कापूस उत्पादनासाठी ओळखले जाते. दुष्काळी स्थिती असल्याने ९९ टक्‍के शेतकरी ठिबकवरच कापसाचे उत्पादन घेतात. कापसाची सरासरी उत्पादकता १२ क्‍विंटलची राहते. या वर्षी पाण्याची जेमतेम उपलब्धता असल्याने ही उत्पादकता एकरी आठ ते नऊ क्‍विंटलवर आली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com