सोलापूर बाजार समितीत कांद्याचे लिलाव रोखले

सोलापूर बाजार समितीत कांद्याचे लिलाव रोखले
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणावर चोरी होत असल्याने व्यापाऱ्यांनी बुधवारी (ता.२२) कांदा लिलाव बंद पाडले.
 
दरम्यान, व्यापाऱ्यांनी अचानकपणे घेतलेल्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त झाला. बाजार समिती प्रशासकाकडून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असताना पुन्हा दोन्ही बाजूंनी गोंधळ झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.
 
या सगळ्यांत सुमारे दोन तास व्यवहार ठप्प झाले. बाजार समितीचे प्रशासक-कुंदन भोळे, सचिव विनोद पाटील यांनी व्यापारी, शेतकऱ्यांशी चर्चा करून याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत आश्‍वासन दिल्यानंतर व्यवहार सुरळीत सुरू झाले.
 
बाजार समितीत रोज सकाळी दहा वाजता लिलाव सुरू होतात, पण बुधवारी लिलाव सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासातच व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडले. बाजार समितीच्या आवारातून गेल्या अनेक महिन्यांपासून कांद्याची चोरी होत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत कांद्याच्या दरात वाढ झाल्याने चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे.
 
त्यामुळे व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडले. कांद्याची मोठ्या प्रमाणावर चोरी होत असल्याने एक ट्रक मागे सुमारे ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान होत असल्याचे या वेळी व्यापाऱ्यांनी सांगितले. 
 
प्रशासनाच्या कानावर या घटना घालूनही चोऱ्या कमी होत नसल्याने व्यापाऱ्यानी लिलाव बंदचे पाऊल उचलले, तसेच लिलावाच्या अगोदर वजन न करता लिलाव झाल्यानंतरच शेतकऱ्यांच्या मालाचे वजन करावे, अशी मागणी या वेळी व्यापाऱ्यांनी लावून धरली. त्यामुळे वातावरण चांगलेच चिघळले,
 
पण या सगळ्यांमध्ये दूरवरून आलेल्या शेतकऱ्यांना लिलावासाठी ताटकळावे लागल्याने पुन्हा गोंधळ वाढला. त्यात काहींनी काटामारीचा विषयही पुढे केला, या वेळी बाजार समिती प्रशासक श्री. भोळे हे मागण्या मान्य करून लवकरात लवकर बाजार समितीमध्ये सुरक्षा वाढवू, असे सांगत होते. मात्र व्यापारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, पण शेवटी चर्चेतून मार्ग काढण्यात आला आणि दुपारी साडेअकराच्या सुमारास व्यापाऱ्यांनी माघार घेत व्यवहार सुरळीत सुरू झाले.
 
शेतकऱ्यांना फटका
सोलापूर बाजार समितीमध्ये महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी घेऊन येतात. शेतकऱ्यांनी मंगळवारी कांद्याच्या गोण्या भरलेल्या होत्या. त्यानंतर बुधवारी लवकर लिलाव न झाल्याने सुमारे २४ तासांनंतरही तो कांदा गोण्यांमध्येच होता.
 
त्यामुळे या कांद्याचे नुकसान होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांचा राग अनावर झाला होता. व्यापाऱ्यांनी त्यांना काय बंद करायचा आहे, तो लिलाव झाल्यानंतर करावा किंवा गुरुवारी (ता.२३) बाजार समिती बंद ठेवावी व तोडगा काढावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. या सगळ्यांचा फटका शेतकऱ्यांना बसला.
बाजार समितीत रात्री आणि दिवसाही सुरक्षेसाठी पोलिस मागवू, हमाल-तोलार, अडते, व्यापाऱ्यांना आय कार्डची सक्ती करू. कोण चोऱ्या करतो आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. लाखो रुपयांचा खर्च करून बाजार समितीत सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत, पण त्याच्यात कांदे भरून ते बंद पाडले जातात. व्यापाऱ्यांनीही परवानाधारक हमाल ठेवावेत.
- कुंदन भोळे, प्रशासक, सोलापूर बाजार समिती, सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com