कांदा निर्यातीत ५६ टक्क्यांनी वाढ; तरीही अायात

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली  ः देशातून यंदा एप्रिल-जुलैदरम्यान कांदा निर्यातीत ५६ टक्क्यांनी वाढ झाली अाहे. तरीही सध्या देशांतर्गत बाजारात कांद्याचे किरकोळ दर वाढले असल्याचे कारण देत केंद्राकडून कांदा अायात केली जात अाहे.
 
देशातून यंदा एप्रिल- जुलैदरम्यान १२.२९ लाख टन कांदा निर्यात करण्यात अाली अाहे. ही निर्यात मूल्यात १,४४३.०९ कोटी एवढी अाहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ९७७.८४ कोटी रुपयांचा कांदा निर्यात करण्यात अाला होता. यंदा निर्यात झालेल्या कांद्याचे मूल्य ४७.६९ टक्क्यांनी अधिक अाहे.
 
देशातील विविध भागांत कांद्याचे दर वाढले अाहे. या पार्श्वभूमीवर कांद्याचे दर नियंत्रणात राहावेत, उपलब्धतता वाढावी यासाठी गेल्या अाठवड्यात केंद्र सरकारने एमएमटीसी या सरकारी एजन्सीमार्फत इजिप्त, चीनमधून कांदा अायातीसाठी परवानगी दिली अाहे.
 
सांख्यिकी महासंचालनालयाने (डीजीसीअायएस) दिलेल्या अाकडेवारीनुसार, एप्रिल- जुलैदरम्यान १२.२९ लाख टन कांदा निर्यात झाला अाहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ७.८८ लाख टन कांदा निर्यात झाला होता. यंदा कांदा निर्यातीत झालेली वाढ ५६ टक्क्यांनी अधिक अाहे.
 
जागतिक बाजारपेठेत कांद्याचे दर चढेच
कांद्यावर किमान निर्यात मूल्य (एमईपी) नाही. तसेच जागतिक बाजारपेठेत कांद्याचे दर वाढले अाहेत. या 
दोन कारणांमुळे भारतातून होणाऱ्या कांदा निर्यातीत वाढ झाली अाहे, अशी माहिती राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन अाणि विकास प्रतिष्ठानचे (एनएचअारडीएफ) प्रभारी संचालक पी. के. गुप्ता यांनी दिली अाहे.
 
पहिल्या तिमाहीत जेव्हा कांद्याचे दर घसरले होते. मात्र निर्यातीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळाला. सध्या कांद्याच्या साठ्यात घट झाल्याने देशांतर्गत बाजारात दर वाढले अाहेत. यामुळे निर्यात काहीशी मंदावली अाहे, असेही त्यांनी नमूद केले अाहे. सध्या जुना कांदा संपला असून नवीन कांद्याची अावक कमी अाहे, यामुळे कांद्याचे किरकोळ दर वाढले असल्याचे त्यांनी सांगितले.
 
११ हजार टन कांदा अायात
देशांतर्गत बाजारात कांद्याची उपलब्धतता राहावी, यासाठी केंद्र सरकारने खासगी व्यापाऱ्यांना कांदा अायात करण्यास मुभा दिली. यामुळे अातापर्यंत देशांतर्गत बाजारात ११,४०० टन अायात कांदा पोचला अाहे.
 
खरीप कांदा क्षेत्रात ३० टक्क्यांनी घट
खरीप कांदा क्षेत्रात ३० टक्क्यांनी घट झाल्याने उत्पादन घटण्याची शक्यता अाहे. या पार्श्वभूमीवर कांद्याचे दर वधारले अाहेत. देशात खरीप हंगामातून ४० टक्के कांद्याचे उत्पादन घेतले जाते. उर्वरित कांदा उत्पादन रब्बी हंगामात घेतले जाते. मुख्यतः महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, बिहार, गुजरात या राज्यांत कांद्याचे उत्पादन घेतले जाते.
 
एमईपी काढल्याने निर्यातीत वाढ 
‘डीजीसीअायएस’कडून मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल- जुलैदरम्यान प्रतिटन ११,७३७ रुपये दराने कांदा निर्यात झाली. कांदा निर्यात मूल्यामुळे दर कमी मिळून निर्यातीत घट झाली होती. मात्र डिसेंबर २०१५ मध्ये कांद्यावरील निर्यात मूल्य काढून टाकण्यात अाले. त्यानंतर कांद्याचे किरकोळ दर वाढल्यानंतर कांद्यावर किमान निर्यात मूल्य लागू करण्याची मागणी ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी केली होती. मात्र निर्यात मूल्य लागू करण्यात अाले नाही. 
कांद्यावर किमान निर्यात मूल्य (एमईपी) नाही. तसेच जागतिक बाजारपेठेत कांद्याचे दर वाढले अाहेत. या दोन कारणांमुळे भारतातून होणाऱ्या कांदा निर्यातीत वाढ झाली अाहे.
- पी. के. गुप्ता, प्रभारी संचालक, राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन अाणि विकास प्रतिष्ठान (एनएचअारडीएफ)
एप्रिल- जुलैमधील कांदा निर्यात (नग) 
 
२०१७
१२.२९ लाख टन
२०१६ ७.८८ लाख टन

एप्रिल- जुलैमधील कांदा निर्यात (मूल्य) 

 
२०१७ १,४४३.०९ कोटी
२०१६ ९७७.८४ कोटी

 

 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com