धुळे ः धुळे जिल्हा यंदा कांदा उत्पादनात अग्रेसर राहणार आहे; परंतु आगाप कांद्याला यंदा अपेक्षित दर नसल्यामुळे शेतकऱ्यांना हे पीक परवडेल की नाही, अशी भीती आहे. काही शेतकऱ्यांनी तर उत्पादन खर्चही निघतो की नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
धुळे जिल्ह्यातील शेतकरी कांदा उत्पादनासंबंधी नेटके व्यवस्थापन करून दर्जेदार कांदा घेऊ लागले आहेत. यंदा सूक्ष्मसिंचनाखालील कांदा क्षेत्र अधिक होते. धुळे तालुक्यातील कापडणे, न्याहळोद, देवभाने, नेर, कुसुंबा, चौगाव, जापोरे, साक्री तालुक्यातील पिंपळनेर, शिरपुरातील गिधाडे, तऱ्हाडी, बेगाव, शिंदखेडामधील टाकरखेडा, सुखवद आदी भागांत कांद्याची लागवड झाली होती.
सुमारे अडीच हजार हेक्टरवर धुळे जिल्ह्यात कांदा लागवड झाली होती. न्याहळोद भागात आगाप लागवडही काही शेतकऱ्यांनी केली. सूक्ष्म सिंचन व विद्राव्य खते असे चांगले व्यवस्थापनही अनेक शेतकऱ्यांनी केले. त्यासाठी जादा खर्च आला.
बियाणे, मशागत, लागवड, तणनियंत्रण, फवारणी, विद्राव व इतर खते, खांडणी व इतर खर्च मिळून एकरी सुमारे ५० हजार रुपये खर्च कांदा पिकाला येत आहे; परंतु दर हवे तसे नाहीत. मागील १५ दिवस तर दरावर दबाव आहे. पांढऱ्या कांद्याला कमाल ६५० रुपये क्विंटलचा दर आहे. लाल कांद्याला ६०० ते १२०० रुपये क्विंटल, असे दर मागील दोन आठवड्यांपासून धुळे, पिंपळनेर बाजार समितीमध्ये आहेत.
अशी स्थिती असल्याने ज्या शेतकऱ्यांनी आगाप लागवड केली होती, त्यांनी आपला कांदा साठवायला सुरवात केली आहे. त्यासाठी श्रम व मजुरीवरील खर्च वाढला आहे; परंतु दर परवडणारे नसल्याने तो बाजारात विकून अधिक नुकसान होईल, त्यापेक्षा साठवणुकीची जोखीम स्वीकारणे, शेतकरी पसंत करीत आहेत.
यंदा पाऊस कमी होता; परंतु शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर दर्जेदार उत्पादन घेण्याची किमया साधली आहे. सिंचनासाठी रात्री अपरात्री शेतकरी शेतात धावपळ करीत होते; परंतु दर अपेक्षित नसल्याने त्यांच्यात निराशा आहे.