वऱ्हाडात कांदा बीजोत्पादकांची फसगत

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला : करार करूनही चुकारे देण्याची वेळ आली तेव्हा कंपन्या काढता पाय घेतात हा कांदा बीजोत्पादकांसाठी दरवर्षीचा अनुभव झाला आहे. या वर्षी तर कांद्याचे भाव कमी असल्याने २५ ते ४० हजारांदरम्यान करार झाले. शेतकऱ्यांनीही त्याला होकार दिला. मात्र, आता भाव कमी मिळत असल्याने या करारांबाबत विदारक वस्तुस्थिती समोर येऊ लागली आहे.

कांदा बीजोत्पादक शेतकरी व बियाणे खरेदी करणाऱ्या काही कंपन्या यांच्यात झालेल्या करारांबाबत शेतकऱ्यांकडे कुठलाही पुरावा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची फसगत होत असल्याचे वऱ्हाडात चित्र आहे.

दरवर्षी कांदा बियाण्यांचे भाव काय राहतील हे हंगामाच्या सुरवातीलाच स्पष्ट केले जाते. किमान एवढा भाव मिळेल याची खात्री देण्यात येते. विक्रीच्या वेळी बाजारभाव वाढला असेल तर ती तफावत दिली जाईल असेही तोंडी सांगितलेले असते. आता हे मध्यस्थ करार म्हणून सांगितलेली रक्कम मिळवून देण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत.

कांदा बियाण्याची जर्मिनेशन पॉवर तपासली तर कमी आहे, बी चांगले नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचे बियाणे कंपन्यांनी परत पाठवले. त्यामुळे शेतकरी धास्तावले. आता हे शेतकरी एकीकडे हंगामापूर्वी केलेल्या करारानुसार विचारणा करीत असताना त्यांच्या हातात कुठलाही कागद नाही. कंपन्यांसाठी काम करणाऱ्या मध्यस्थांनी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या, कोरे चेक व बाँड आधीच घेतले आहे.

वाशीम जिल्ह्यात शासनाच्या एका सीड्स कॉर्पोरेशनच्या नावावर काही मध्यस्थांनी शेतकऱ्यांकडून बीजोत्पादन करून घेतल्याचे शेतकरी सांगत आहेत. परंतु गेल्या हंगामात अशा प्रकारचा कुठलाही बीजोत्पादन कार्यक्रम या भागात नव्हता असे अकोला येथील या कॉर्पोरेशनच्या विभागीय अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

शिवाय जर संबंधितांनी कॉर्पोरेशनकरिता इतर ठिकाणी संपर्क करून बीजोत्पादन घेतलेच असेल तर कॉर्पोरेशनकडून चुकाऱ्याचे कुठलेही धनादेश खासगी व्यक्तीच्या माध्यमातून शेतकऱ्याला दिले जाऊ शकत नाहीत, असा दावा या अधिकाऱ्याने केला. शासनाच्या धोरणानुसार चुकाऱ्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असती किंवा शासनाचे धनादेश राहले असते.

आता कुणालाही रोख किवा धनादेशाने चुकारे दिले जात नाहीत. हे सर्व लक्षात घेता कांदा बीजोत्पादकांसोबत मोठी बनवाबनवी झाल्याची शंका घेतली जाऊ लागले. येत्या हंगामात तरी जागरूकता हवी.

लवकरच कांदा बीजोत्पादनाचा हंगाम सुरू होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांसोबत कराराच्या नावाखाली काही कंपन्या बनवाबनवी करीत असतात. मध्यस्थांना टारगेट देऊन या कंपन्या बीजोत्पादन करतात. बाजारात दर कमी झाले की हात वर करून मोकळ्या होतात.

भाव वाढले तर कराराची आठवण देत बियाणे नेतात. त्यांनी शेतकऱ्यांनी कंपन्यांसोबत करार करताना त्याची एक प्रत स्वतःजवळ ठेवणे गरजेचे  आहे. सध्या या कंपन्या एक कागदसुद्धा शेतकऱ्यांना देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना नंतर काहीही करता येत नसल्याची प्रकरणे वाढली आहेत.

वऱ्हाडात पाच हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कंपन्यांसाठी करार पद्धतीने बीजोत्पादन कार्यक्रम घेतले जातात. काही नामांकित कंपन्या सोडल्या तर दरवर्षी नव्याने दाखल होणाऱ्या कंपन्या व त्यांच्यासाठी काम करणाऱ्या मध्यस्थांनी त्यांची लूटच चालवली आहे.

करार ४० हजारांचा दिले १५ हजार मेहकर तालुक्‍यातील एका शेतकऱ्याने नामांकित कंपनीसोबत ४० हजार रुपये क्विंटल दराने करार केला होता. कंपनीने केवळ १५ हजारांचा दर दिला. ६ क्विंटल बियाण्याचे ९० हजार रुपये दिले. उर्वरित रक्कम कधी देणार याबाबत कुणीही बोलायला तयार नाही. आमच्या गावातील किमान ५० लाखांपेक्षा अधिक रक्कम या कंपनीकडे शिल्लक राहल्याची आपबीती या शेतकऱ्याने सांगितली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com