‘नाणार’प्रश्नी विरोधकांसह शिवसेना आक्रमक

‘नाणार’च्या मुद्यावरून विरोधी पक्षासोबत शिवसेनेच्या सदस्यांनी राज्य सरकारवरच अविश्‍वास दाखविल्यामुळे फडणवीस सरकारने विश्‍वास गमावला आहे. विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य नाणार प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करीत होते. या मागणीला सत्तारुढ पक्षातील शिवसेनेच्या सदस्यांनीसुद्धा समर्थन दिले. याचाच अर्थ शिवसेनेचा या मुद्यावरून फडणवीस सरकारवर विश्‍वास राहिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. -पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री.
विधीमंडळ अधिवेशन
विधीमंडळ अधिवेशन

नागपूर  : नाणार प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांसह शिवसेना आमदार गुरुवारी (ता. १२) विधानसभेत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या तिन्ही पक्षांच्या सर्वच आमदारांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमा होत घोषणा देत गोंधळ घातल्याने सभागृहाचे कामकाज पाच वेळा तहकूब करण्यात आले. त्यानंतरही गोंधळ कायम राहिल्याने अखेर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

दरम्यान, या गोंधळातच सहकार विभागाचे पुनर्स्थापना विधेयक, शिक्षण विभागाचे विद्यापीठ विधेयक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते महामार्ग विधेयक, वित्त विभागाचे विनियोजन विधेयक यासह पाच विधेयके राज्य सरकारने मंजूर करून घेतली.

कामकाजाच्या सुरवातीलाच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनात झालेल्या बनवाबनवीचे कागदोपत्री पुरावे सभागृहात मांडले. विखे पाटील यांनी नाणार प्रकल्पाबाबत नियम ५७ आणि ९७ अन्वये स्थगन प्रस्तावाची सूचना दिली होती. नाणार प्रकल्पाला लोकांचा विरोध असून, सरकार बनावट संमतीपत्रांच्या आधारे भूसंपादन करते आहे. हा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी नाणारचे नागरिक थेट नागपुरात दाखल झाले आहेत. त्यामुळे सभागृहाचे उर्वरित कामकाज स्थगित करून नाणार प्रकल्पाबाबत चर्चा घ्यावी आणि हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी त्यांनी मांडली. सरकारने चर्चा न केल्यास सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. मात्र यासंदर्भात सरकारकडून कोणतीच भूमिका स्पष्ट न झाल्याने विरोधी पक्षांचे आमदार आक्रमक झाले होते.

विखे पाटील म्हणाले की, नाणार प्रकल्पाला सर्व १७ गावांनी विरोध दर्शवलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या गावांमध्ये ग्रामसभा घेऊन संमती मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, पहिल्या तीन गावातच तीव्र विरोध झाल्याने ग्रामसभा घेण्याचा विचार प्रशासनाला सोडून द्यावा लागला. या प्रकल्पामध्ये जमिनी गेलेल्या नागरिकांची संमतीपत्रे घेतल्याचा दावा सरकार करते आहे. परंतु, हा दावा साफ खोटा आहे. मूळ कोकणवासी नसलेल्या बाहेरील काही नागरिकांनी या गावांमध्ये जमिनी खरेदी करून ठेवल्या होत्या; त्या नागरिकांनी आपल्या जमिनी प्रकल्पाला देत असल्याचे संमतीपत्र सरकारला दिली आहेत, असे सांगून विखे पाटील यांनी गोठीवरे गावातील खरेदी व्यवहारांची एक यादी सभागृहात सादर केली.

त्याचप्रमाणे गोठीवरे येथील मारुती सीताराम मांजरेकर नामक व्यक्ती पोलिस रेकॉर्डनुसार मागील २० वर्षांपासून बेपत्ता आहे. परंतु, बेपत्ता असलेल्या मांजरेकर यांचे बनावट आधारकार्ड तयार करून त्यांचे कुलमुखत्यारपत्र तयार करण्यात आले व त्या आधारे नाणार प्रकल्पासाठी भूसंपादन झाल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. यासंदर्भात अॅड. अश्विनी आगाशे यांनी राजापूर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार केल्याची माहिती त्यांनी दिली.

विधानसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वीही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली. बोंडअळी, मावा, तुडतुड्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेली संपूर्ण मदत तातडीने बॅंक खात्यात जमा करण्याची मागणीही यावेळी विरोधी पक्षाच्या आमदारांनी लावून धरली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com