संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पीक नुकसानीचे दहा दिवसांत पंचनामे करण्याचे आदेश

औरंगाबाद : कापूस व धान पिकाच्या झालेल्या नुकसानीचे दहा दिवसांत पंचनामे करून नुकसान झालेल्या क्षेत्राचे सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत.

त्या अनुषंगाने मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातून बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान कपाशीचे अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती महसूलचे उपायुक्‍त प्रल्हाद कचरे यांनी दिली.

शासनाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना तसे सुचित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठवाड्यासह राज्यभर यंदा कपाशीवर आलेल्या बोंड अळीने कहर केला आहे. बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे मराठवाड्यातील सर्वच्या सर्व क्षेत्र बाधीत असल्याचे समोर आले आहे. औरंगाबाद, जालना व बीड या तीनही जिल्ह्यात यंदा १० लाख ४८ हजार ५३९ हेक्‍टरवर कपाशीची लागवड केली. हे सर्वच्या सर्व क्षेत्र बोंड अळीने बाधीत झाले आहे.

लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या पाचही जिल्ह्यांतील ४८ तालुक्‍यात यंदा ५ लाख ४३ हजार ७०५ हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली होती. यापैकी ४ लाख ७६ हजार ४४ हेक्‍टर क्षेत्र बोंड अळीने मोठ्या प्रमाणात प्रभावीत झाल्याने त्यांचा थेट परिणाम कपाशीच्या उत्पादनावर झाला आहे.

एकीकडे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात येत असलेल्या तक्रारीवरून प्रत्यक्ष पंचनामे व त्यानुसार तक्रार निवारण समीतीकडून कारवाईसंदर्भात उचलली जाणारी पावले. तर दुसरीकडे या प्रक्रियेला लागणारा वेळ लक्षात घेवून यापूर्वी लाल्या रोगाच्या वेळी शासनाने जी नुकसान भरपाई देण्याची पद्धत अवलंबली होती त्यानुसार काही करता येईल का, यादृष्टीने शासनाकडून आढावा घेण्याचे काम सुरू होते.

मात्र जोपर्यंत महसुली पंचनामे होत नाहीत, तोवर शासनाकडून काही मदत होईल का, हा प्रश्‍न अधांतरी होता. तसेच शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून पावले उचलली जावी म्हणून विविध शेतकरी संघटना, राजकीय पक्षाकडून याविषयी आवाज उठविल्या गेला होता.

आता शासनाने ७ डिसेंबरला शासनाने सर्व विभागीय आयुक्‍तांसह सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कापूस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. नैसर्गिक आपत्तीत कीड हल्ल्याचा समावेश असल्याने व मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश शासनाने सर्व विभागीय व जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

नुकसानग्रस्त शेतीचे फोटो मोबाईल ॲपच्या माध्यमातून जीपीएस वर अपलोड करण्याचे स्पष्ट करण्यात आले असून नुकसान ठरविण्यासाठी पिकाची नोंद सातबारामध्ये असणे आवश्‍यक आहे. शासनाच्या आदेशानुसार तशी माहिती जिल्हास्तरावरून माहिती मागविण्यात आली असल्याचे उपायुक्‍त प्रल्हाद कचरे यांनी सांगितले.

कुणीही वंचित राहू नये औरंगाबाद जिल्ह्यातील ढवळापूरी येथील सदाशिव पुंगळे यांना यंदा पाच एकरातून केवळ १५ क्‍विंटल कापूस उत्पादन झाले. पाच एकरात खर्च एकरी जवळपास २० ते २५ हजार झाला. उत्पादन मात्र बाजारभावानुसार ६० ते ७० हजाराचेच आले. अनेक शेतकऱ्यांप्रमाणे त्यांनी कपाशी मोडल्यावर शासनाचे पंचनाम्याचे वृत्त आले. काहीनी पाण्याची सोय असल्यामुळे दुसरे रब्बी पिकही घेतले. त्यामुळे शासनाने पंचनामे करताना कुणीही न्यायापासून वंचित राहणार नाही अशा पद्‌धतीने वस्तूनिष्ट पंचनामे करण्याची मागणी सदाशिव पुंगळेसह शेतकरी वर्गातून होते आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com