नव्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

नव्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

नाशिक : ओखी चक्रीवादळामुळे बदललेल्या हवामानामुळे हवेत गारवा वाढून अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्याला झोडपून काढले असून, आठ तासांत सुमारे १२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे द्राक्ष बागांसह भाजीपाला, कांदा, मका आदी पिकांचे अतोनात नुकसान होऊन शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे. आॅक्टोबर महिन्यात अशाच प्रकारे वादळी पावसाने केलेल्या नुकसानीची अद्यापही शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नसताना त्यात पुन्हा नव्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सोमवारी (ता. ४) दुपारनंतर हवामानात अचानक झालेल्या बदलाचा फटका दुसऱ्या दिवशीही कायम राहिला. मंगळवारी (ता. ५) सकाळी सात वाजेनंतर नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवकाळी पावसाचे आगमन झाले. वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या या पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला. आॅक्टोबरच्या अवकाळी पावसापासून कसेबसे बचावलेल्या द्राक्ष बागांवर संकट कोसळले. पावसामुळे द्राक्षांचे घडे तुटून पडले तर काहीं बागांमध्ये मणी गळून पडण्याचे प्रकार घडले. द्राक्ष बागेत पावसाचे पाणी साचल्यामुळे द्राक्ष उत्पादकांसमोर मोठे संकट कोसळले आहे. त्याच बरोबर विक्रीसाठी काढून ठेवलेला मका, तसेच उघड्यावरील लाल कांदाही पावसाच्या पाण्यात भिजून मोठे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. भाजीपाला व शेतातील गहू, हरभरा पिकालाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. मंगळवारी दिवसभर जिल्ह्यात ढगाळ हवामान व पावसाची हजेरी कायम होती, त्यामुळे हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला. नागरिकांनी घराबाहेर पडण्यास नापसंती व्यक्त केली तर नोकरदारांचीही धावपळ उडाली.

गेल्या दोन महिन्यांत अवकाळी पावसाने तीन वेळा हजेरी लावून नुकसान केल्यामुळे मंगळवारी जिल्हा प्रशासनाने तलाठी, मंडल अधिकारी, कृषी विभागाला शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होण्याची अपेक्षा असून, त्यानंतरच खऱ्या अर्थाने नुकसानीचा अंदाज बांधता येणार आहे. आॅक्टोबर महिन्यात अशाच प्रकारे दोन दिवस अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने सुमारे साडेसहाशे गावातील ५० हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, त्याचा अहवाल गेल्या आठवड्यातच कृषी खात्याकडून सादर करण्यात आला आहे. या नुकसानीची अद्याप शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे ओखी वादळामुळे झालेल्या नुकसानीची त्यात भर पडल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. कांदा व मक्याला चांगला भाव मिळू लागलेला असताना, तसेच द्राक्ष काढणीवर आलेले असताना अस्मानी संकट कोसळले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com