सेंद्रिय कर्बामुळेच टिकेल शेती

पिके लवकर पाणी मागतात, याचा अर्थ त्या मातीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असते. कारण तिथली माती जलसंवर्धन करीत नाही किंवा पाणी साठवून ठेवू शकत नाही.
संपादकीय लेख
संपादकीय लेख

पावसाच्या तीव्रतेने जमिनीच्या वरच्या थराची धूप होते. कारण पावसाच्या थेंबाने मातीचे कण एकमेकांपासून विलग होऊन वाहून जाताना सोबत वरच्या नऊ इंच थरात साठलेले सेंद्रिय कर्ब वाहून जाते. जे पाणी वाहताना गढूळ, लालसर दिसते ते म्हणजे जमिनीचा खरा प्राण (सत्व) होय. तो दरवर्षी असा वाहून गेल्याने पुन्हा तो तयार व्हायला फार काळ लागतो. ज्या शेतीला चारी बाजूने बांधबंदिस्ती आहे व एका भागातून अतिरिक्त पाणी एका ठराविक उंचीवरून अडवून ते स्वच्छ असे वाहून जाते, तिथला कर्ब शाबूत राहतो. आपल्याकडे मोठ्या प्रमणात जमिनी खाली-वर व उताराच्या आहेत. काही तीव्र उताराच्या असून, उंचावरचे पाणी एकमेकांच्या शेतातून वाहून नदीला, नाल्याला मिळते. तिथले सेंद्रिय कर्ब कसे टिकेल, त्यासाठी समान पातळी ठेवून शेतीची छोटी-छोटी तुकडे करून मजबूत बांधबंदिस्ती केली पाहिजे व प्रत्येत शेतीतून, सर्व्हे नंबरमधून बाहेर पडणाऱ्या पाण्याला नाल्यावाटे, शेतचारीवाटे बाहेर काढून देण्याची व्यवस्था व्हायला हवी. पण ती आजकाल कुठेच दिसत नाही. हेच तर शेती वाहून जाण्याचे मूळ कारण आहे. जिथे जमिनीची निचरा स्थिती चांगली, तिथे पाणी मोठ्या प्रमाणात जमिनीत मुरते. पाणी मुरले तर ते वाहून जाताना जमिनीतील रस घेऊन जाणार नाही, यासाठी योग्य बांधबंदिस्ती महत्त्वाची आहे. जिथे पाण्याचा निचरा कमी होतो, त्या जमिनी चिबड होतात. कारण शक्‍यतो काळ्या जमिनीत पाण्याचा निचरा कमी होऊन चिबड होण्याचे कारण मातीच्या दोन कणातील अंतर कमी होऊन त्या एकमेकांना घट्ट चिकटून बसतात, त्यामुळे आत हवाच शिरत नाही. पर्यायाने हवा नसेल तर पाणी कुठे साठणार. मग असा जमिनीची जलधारण क्षमता घटते. आत हवा नसल्याने सूक्ष्म जीवाणूंची वाढच होत नाही आणि पिकाचेही उत्पादन मिळत नाही. कारण तिथे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण अत्यंत कमी राहाते. साधे उदाहरण पाहू, एक कुंडी माती भरून सततच्या पावसात ठेवा. तिच्यातून खाली सुराकातून पाझरणारे पाणी सुरवातील गढून असते, नंतर नंतर स्वच्छ पाणी पाझरते. म्हणजे मातीत थोडेही कर्ब शिल्लक नसल्याने वरून पाणी टाकले, की ते खालून निघून जाते. त्या कुंडीत कितीही पाणी टाका, झाड वाढतच नाही. पिके लवकर पाणी मागतात, याचा अर्थ त्या मातीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असते. कारण तिथली माती जलसंवर्धन करीत नाही किंवा पाणी साठवून ठेवू शकत नाही. शेती जास्त काळ उघडी राहिल्याने आतील पाण्याचे बाष्पीभवन होऊन उडून जाते व मधल्या जीवाणूंना ओलावा मिळत नसल्याने तीही मरतात. सध्याच्या अवर्षणाचा व लहरी पावसाचा विचार करता दोन पाण्याच्या पाळ्या म्हणजे दोन पावसातील अंतर वाढते आहे. त्यामुळे पिकांवर ताण येऊन ती स्वतःचेच खोडात साठवलेले अन्न, पाणी वापरून जगतात. पर्यायाने पुढील वाढीसाठी व पीक उत्पादनासाठी जमिनीत सतत ओलावा राहावा लागतो. म्हणून प्रत्येक चार-पाच एकर शेतीत एक शेततळे गरजेचे आहे. अशा आणीबाणीच्या काळात ते पाणी दिल्यास पिके टिकतील. कारण एकूण पेरणी लायक क्षेत्रापैकी ८२ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे, तिथे या बाबींची गरज आहे. दर चार वर्षाला बागायती व दुबार-तिबार पेरणीक्षेत्रात हिरवळीची खते ताग, ढैंचा, बरू, चवळी, गिरीपुष्प अशी द्विदल पिके फुलोऱ्यात असताना गाढली तर जमिनीचा पी.एच. कमी होऊन सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते. शेतीतील गवत, काडीकचरा, धसकटे न जाळता गोळा करून नॅडेप, बायोडायनामीक पद्धतीने कुजवून, गांडूळ खत बनवून ते परत जमिनीत टाकले पाहिजे. तृणनाशके, कीडनाशके, रासायनिक खते वापरल्यास उपयुक्त जीवाणू जे जमिनीतील बायोमासचे विघटन करून सेंद्रिय कर्ब तयार करतात, ती पूर्णपणे मरतात. वरच्या थरातील सर्व सूक्ष्म जीव मेल्याने जमिनी कडक बनल्या. पुन्हा पुन्हा उत्पादन वाढवण्यासाठी रसायनांचा मारा वाढला. त्यामुळे पिके म्हणावी अशी सशक्त येईनात. त्यावर पुन्हा रोगकिडींचा प्रादुर्भाव वाढला. मग ती रोखण्यासाठी पुन्हा फवारण्या आल्या. या दुष्टचक्रात उपयुक्त किडी, जीवाणू, बुरशी, कीटक, पक्षी ही मित्र साखळी आम्ही इतके वर्षांत मारून टाकली. मृत्युपंथाला लागलेल्या स्टेचरवर चढवलेल्या पेशंटकडून म्हणजेच, शेतीतून दुप्पट-तिप्पट उत्पादन घेण्याचे स्वप्न आम्ही पाहतो आहोत. जोपर्यंत माती धष्टपुष्ट होत नाही, तोपर्यंत एवढी मोठी लढाई आम्ही जिंकूच शकत नाही.

परवा डॉक्‍टर म्हणाले, अतितीव्रतेच्या औषधांच्या सेवनामुळे आतड्यातील अन्न पचवणारे जीवाणू नष्ट होतात म्हणून अन्न न पचता अपचनासारखी विष्ठा बाहेर पडते. पोटात पूर्णवत जीवाणूंची संख्या वाढविण्यासाठी लॅक्टिक ॲसिडची पावडर जेवणापूर्वी पाण्यातून घ्यावी लागेल. तेव्हा पचन हळूहळू पूर्वपदावर येईल. हेच उदाहरण मातीसाठीही लागू पडते. जोपर्यंत आपण शेतीत पशुधन वाढवून कंपोष्ट खत, गांडूळ खत, निंबोळी, माशाचे, पेंढीची खते टाकणार नाही, आगपेटीमुक्त शिवार ठेवणार नाही, बांधबंदिस्तीला महत्त्व देणार नाही, पिकांची फेरपालट, द्विदल पिके, हिरवळीची खते घेणार नाही, हानिकारक रसायनांपासून शेतीला दूर ठेवणार नाही, देशी व सरळ वाण पेरणार नाही, तोपर्यंत शेतीत सूक्ष्म जीव, पक्षी, मित्र कीटक वाढणार नाहीत. हे निसर्गचक्र जोपर्यंत एकसंघ होऊन ही साखळी पूर्वपदावर येणार नाही, तोपर्यंत शेतीचा प्राण असलेला सेंद्रिय कर्ब ज्यावर उत्पादकतेची इमारत उभी आहे, ती उभीच राहू शकणार नाही. यासाठी ही एक, दोन वर्षांची लढाई नसून, सतत दहा-वीस वर्षांच्या प्रयत्नाने किमान दोन टक्‍क्‍यांपर्यंत सेंद्रिय कर्ब नेण्यास आपण पात्र होऊ, जो पुढे भविष्यात चार टक्क्यांपर्यंत वाढवायचा आहे.

- रमेश चिल्ले  ः ९४२२६१०७७५ (लेखक शेती व पर्यावरणाचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com