पुणे जिल्ह्यात होणार यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड

मजूरटंचाईवर मात करण्यासाठी कृषी विभाग व आत्माच्या माध्यमातून तीन वर्षांपासून भात शेतीत यांत्रिकीकरणाचा प्रयोग करण्यात येत आहे. त्याचा फायदा दिसून येत असल्याने शेतकरी यांत्रिकरणाद्वारे भात लागवडीकडे वळत आहेत. यंदाही तीनशे एकरांवर यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवडीचे प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे. - बाळासाहेब पलघडमल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : दरवर्षी शेती कामांसाठी मजुरांची चांगलीच अडचण भासते. या अडचणीवर मात करण्यासाठी जिल्‍ह्यातील शेतकऱ्यांनी सुमारे ३०० एकरांवर यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या तीन वर्षांपासून यांत्रिकीकरणाचा प्रयोग यशस्वी होत असल्याने यंदाही हा प्रयोग राबविण्यात येणार आहे. त्यामुळे भात पिकाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.  

जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात खरिपात प्रामुख्याने भात पीक घेतले जाते. भात लागवडीमध्ये मजुरीवरील खर्च अधिक आहे. प्रत्यक्ष भात लागवडीच्या वेळी मजुरांची कमतरता भासते. नेमकी ही गोष्ट लक्षात घेऊन यावर मात करण्यासाठी आत्माअंतर्गत गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने प्रतत्न करण्यात येत आहेत. आत्मा योजनेअंतर्गत २०१५-१६ मध्ये नावीन्यपूर्ण बाबीखाली बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राला एक स्वयंचलित भात लावणी यंत्र शंभर टक्के अनुदानावर देण्यात आले होते.

२०१६-१७ मध्ये नाटंबी येथे दोन शेतकऱ्यांच्या शेतावर यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवडीचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. याची यशस्विता तपासून २०१७-१८ मध्ये भोर, वेल्हा, मावळ व मुळशी या तालुक्यांतील ९४ शेतकऱ्यांच्या ७७ एकर क्षेत्रावर यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवडीची यशस्वी पीक प्रात्यक्षिके घेण्यात आली होती. याची उपयुक्तता पाहून गेल्या वर्षी (२०१८-१९) भात पट्ट्यातील १६० शेतकऱ्यांच्या १५५ एकरांवर भात प्रात्यक्षिके घेण्यात आली होती.

सध्या भात उत्पादकांनी रोपवाटिका करण्यास सुरवात केली असून, लवकरच लागवडीला वेग येईल. यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड करण्यासाठी आवश्यक असलेल्या रोपवाटिकाही शेतकरी करू लागले आहेत. मावळ तालुक्यातील फळणे येथील शेतकरी बजाबा मालपोटे म्हणाले, की यंदा मी पाच एकरांवर भात आणि अर्धा एकरांवर नाचणीची पेरणी करणार आहे. मला यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड करायची असल्याने त्यासाठी रोपवाटिका तयार केली आहे.

यांत्रिकीकरणाद्वारे होणारे फायदे 

  • मजूर खर्च आणि वेळेत ७० टक्के बचत.
  • बियाण्यांच्या खर्चात ५० टक्के बचत.
  • लागवड ओळीत होत असल्याने आंतरमशागत करण्यास सोपे जाते. 
  • चुडात रोपांची संख्या मर्यादित राहिल्याने फुटव्याची संख्या वाढते, पर्यायाने उत्पादनात वाढ. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com