नागपूर ः कमी पाऊस त्यासोबतच हंगामात झालेला कीड-रोगांचा प्रादुर्भाव या कारणांमुळे धानाची उत्पादकता घटल्याचा निष्कर्ष पीक कापणी प्रयोगाअंती काढण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादकतेत हेक्टरी सात क्विंटलने घट नोंदविण्यात आली आहे.
पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये धान (भात) उत्पादन होते. २०१७-१८ या वर्षातील खरिपात उशिरा तसेच कमी पाऊस झाला. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना रोपवाटिकेतील धान रोपांची रोवणी उशिरा करावी लागली. धानाची रोवणी उशिरा झाल्याने त्याचा उत्पादकतेला फटका बसला. त्यानंतरही संकटांनी धान उत्पादकांची पाठ सोडली नाही.
हंगामात धान पिकावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाला. त्याच्या नियंत्रणासाठी खर्च करावा लागला आणि उत्पादकतेवरही परिणाम झाला. हंगामाअखेर झालेल्या पीक कापणी प्रयोगाअंती गेल्या वर्षीच्या खरिपाच्या तुलनेत या वर्षी हेक्टरी सुमारे सात क्विंटलची तूट झाल्याचे समोर आले आहे.
२०१६-१७ या वर्षात धानाची २०.५० क्विंटल हेक्टरी उत्पादकता मिळाली होती. २०१७-१८ या वर्षात हीच उत्पादकता १३ क्विंटलवर आली आहे.