बुलडाणा : जिल्ह्यात २०१७-१८ च्या खरीप हंगामात झालेल्या कमी पावसामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील महसुली ७४८ गावांमध्ये खरीप हंगामातील पिकांची अंतिम पीक पैसेवारी ५० पैसे व त्यापेक्षा कमी आली आहे. दुष्काळी परिस्थितीत शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सवलती या गावांतील नागरिकांना लागू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील १४०० गावांपैकी ७४८ गावे दुष्काळाच्या छायेत सापडली आहेत.
जिल्ह्यातील ५० पैसे अथवा त्यापेक्षा कमी पैसेवारी जाहीर झालेल्या ७४८ गावांमध्ये जमीन महसुलामध्ये सूट देण्यात आली आहे. या गावांमध्ये कृषी पंपांच्या चालू वीज देयकात ३३.५ टक्के इतकी सूट जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. आवश्यक तेथे पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी टॅंकरचा वापर करण्यात येणार आहे. दुष्काळी स्थिती जाहीर झालेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज जोडणी खंडित न करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
तसेच रोजगार हमी योजनेतंर्गत कामांचे निकष काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात आली असून सहकारी कर्जाचे पुनर्गठन करण्यात येणार आहे. टंचाई जाहीर केलेल्या गावांत सवलतीपोटीचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागाने करावयाचा आहे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
मलकापूर तालुक्यातील ७३ गावांमध्ये खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी ५० पैसे अथवा त्यापेक्षा कमी आलेली आहे. त्याचप्रमाणे मोताळा तालुक्यातील १२०, नांदुरा तालुक्यातील ११२, खामगाव तालुक्यातील १४५, शेगावमधील ७४, संग्रामपूर तालुक्यातील १०५ आणि जळगाव जामोद तालुक्यातील ११९ गावांमध्ये ५० पैसे अथवा त्यापेक्षा कमी अंतिम पैसेवारी आली आहे.