भाऊसाहेब, एक समर्पित लोकप्रतिनिधी : मान्यवरांची श्रद्धांजली

भाऊसाहेब, एक समर्पित लोकप्रतिनिधी : मान्यवरांची श्रद्धांजली
भाऊसाहेब, एक समर्पित लोकप्रतिनिधी : मान्यवरांची श्रद्धांजली

राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग ऊर्फ भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाने कृषी, सहकार आणि संबंधित विषयांची सखोल जाण असणारा आणि या क्षेत्रात सकारात्मक परिवर्तनासाठी प्रयत्नशील असणारा नेता राज्याने गमावला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. मुख्यमंत्री म्हणाले, श्री. फुंडकर यांच्या निधनामुळे मी एक ज्येष्ठ सहकारी आणि मार्गदर्शकाला मुकलो आहे. शेती आणि सहकारासह संबंधित विविध विषयांची त्यांना सखोल जाण होती. ‪विरोधी पक्षनेते, आमदार, संसद सदस्य, भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी भक्कमपणे सांभाळताना पक्षाला नव्या उंचीवर नेण्यात मोठे योगदान दिले. सध्या राज्यात शाश्वत शेतीविकासासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांमध्ये त्यांचा कृषिमंत्री म्हणून मोठा पुढाकार होता. उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजना, पीकविमा योजना, गटशेती, एकत्रित क्रॉपसॅप योजना, महावेध प्रकल्प, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, कृषी व अन्नप्रक्रिया उद्योग अशा अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम-योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांचे कसोशीने प्रयत्न होते. कीटकनाशकांच्या को-मार्केटिंगवर बंदी आणतानाच कीटकनाशके आणि बीटी बियाण्यांचे परराज्यांत उत्पादन करून महाराष्ट्रात ते विविध कंपन्यांच्या नावाने विक्री करण्यासाठी (को-मार्केटिंग) परवाना न देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला होता.  महाराष्ट्राचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने मी दु:खी झालोय. राज्यातील भाजप पक्ष बांधणीत त्यांचे मोठे योगदान होते. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ते नेहमीच आघाडीवर असत.  - पंतप्रधान नरेंद्र मोदी

भाऊसाहेब फुंडकर यांच्या अाकस्मिक निधनाने मला वैयक्तीकरीत्या, भाजपला मोठा धक्का बसला. सहकारात उत्तम काम केले. अतिशय मनमिळावू स्वभावाचे होते. भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. विदर्भात भाजप वाढविण्यात त्यांची मोठी भूमिका होती. राज्याचे कृषिमंत्री म्हणून त्यांनी शेतकऱ्यांसाठी पोटतिडकीने काम चालविले होते. - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर हे लोकनेते आणि समर्पित लोकप्रतिनिधी होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्यांना जाण होती व त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रामाणिक इच्छा होती. फुंडकर यांचे संघटन कौशल्य सर्वज्ञात होते. त्यांनी जनतेच्या विविध प्रश्नांना वेळोवेळी वाचा फोडली. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक उत्तम संसदपटू गमावला आहे  - राज्यपाल विद्यासागर राव

विदर्भातील एक ज्येष्ठ, सहृदयी, मातीशी घट्ट नाळ असलेल्या नेत्याच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची माेठी हानी झाली आहे. अतिशय मनमिळावू, मुदू स्वभावाचे पांडुरंग फुंडकर यांनी राज्यात विधान परिषदेचे विराेधी पक्ष नेते, तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना जनतेच्या प्रश्‍नी कणखर विराेधकाची भूमिकादेखील पार पाडली. राज्याचे कृषिमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द वाखाणण्याजाेगी हाेती. राजकीय विराेधकांकडून मांडलेली समस्या ही देखील जनतेची आहे आणि तिची साेडवणूक केली पाहिजे ही त्यांची सर्वसमावेशक भूमिका हाेती. कृषी आणि कृषी शिक्षणविषयक काेणत्याही नावीन्यपूर्ण याेजनेला त्यांनी नेहेमी सकारात्मक प्रतिसाद दिला व अंमलबजावणीसाठी चालना दिली. बारामतीच्या कृषी विकास प्रतिष्ठानच्या नवनवीन प्रकल्पांसाठी त्यांचे सतत प्राेत्साहन व मदत हाेती. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात पाेकळी सतत जाणवत राहील.  - शरद पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री

पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे एका कुशल संघटकास तसेच शेतीप्रश्नांची जाण असणाऱ्या ज्येष्ठ नेत्यास आपण मुकलो आहोत. पक्षसंघटनेत गेली ४० वर्षे आम्ही दोघांनी बरोबरीने काम केले आहे, त्यामुळे त्यांच्या जाण्याने मला झालेली दु:खवेदना शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही. शेतकरीहितासाठी ते अखंड कार्यमग्न होते. - हरिभाऊ बागडे, विधानसभा अध्यक्ष 

कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने शेतकरी आणि सर्वसामान्यांचा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. शांत संयमी आणि सर्वमान्य नेता असा त्यांचा परिचय होता, सर्वसामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी त्यांची थेट नाळ जुळली होती. सतत कार्यकर्त्यांच्या गर्दीत वावरणारा हा नेता होता.  - सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री

कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे अकाली निधन मनाला चटका लावणारे आहे. महाराष्ट्रात भाजप पक्ष वाढवण्यासाठी श्री. फुंडकर यांचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील शेती व सहकाराच्या प्रश्नाची जाण असलेला एक लोकनेता कायमचा हरपला आहे.  - छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री

कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने कृषी, सहकार, व ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण असणारे अनुभवी व संयमी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. फुंडकर कायम शेतकरी, वंचित आणि मागास घटकांच्या विकासासाठी आग्रही होते. राजकारणासोबतच कृषी, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले.  - खा. अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस

कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे एक संयमी, संवेदनशील व अनुभवी लोकप्रतिनिधी काळाच्या पडद्याआड गेला आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून समोर येत त्यांनी राजकारणात मोठे काम केले. राजकारणात मिळालेल्या प्रत्येक संधीला त्यांनी प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला. ते राज्यातील एक मोठे नेते होते.  - राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा भाऊसाहेबांच्या निधनाने शांत, संयमित, निगर्वी, समर्पित कार्यकर्ता, अजातशत्रू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले असून, मी माझा वैयक्तिक मार्गदर्शक गमावला आहे. राज्याच्या ग्रामीण भागातून पुढे आलेले त्यांचे नेतृत्व होते. प्रदीर्घ काळ काम करताना त्यांनी प्रत्येक पदाला न्याय दिला व त्या पदाचा गौरव वाढविला. - धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद भाऊसाहेबांनीच आम्हाला राजकारणात आणले. १९८३ पासून त्यांच्याशी संबंध होते. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. वऱ्हाडात भाजप घराघरांत पोचविण्याचे श्रेय भाऊसाहेबांनाच आहे. त्यांनी शत-प्रतिशद भाजपचा नारा देत प्रदेशाध्यक्ष असताना पक्षाला बळकटी दिली. त्यांची उणीव कधीही भरून निघणार नाही. - संजय धोत्रे, खासदार, अकोला

कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाचे वृत्त खरे आहे कळाल्यावर शरीरातील चेतना निघून गेल्यासारखे वाटले. भाऊसाहेब म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्न, समस्या, व्यथा जाणणारा आणि त्या सोडविण्यासाठी सर्व शक्ती एकवटून लढणारा नेता होता. मग सत्तेत असो वा विरोधात. जमिनीवर पाय असलेला हा आकाशाच्या उंचीचा नेता ! लढवय्या, अभ्यासू, संवेदनशील आणि विरोधकांनाही भावणारा होता.  - डॉ. रणजित पाटील, गृहराज्यमंत्री (शहरे), तथा पालकमंत्री, अकोला

कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी अाम्हा कर्मचाऱ्यांना न्याय देणारी धोरणे राबविणे सुरू केले होते. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी अाम्हाला वेळ दिला, बैठका घेतल्या. कृषी कर्मचाऱ्यांच्या समस्यांना न्याय मिळू लागला होता.  - अनंत देशमुख, राज्य कोशाध्यक्ष, कृषी सहायक संघटना महाराष्ट्र राज्य बुलडाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र पांडुरंग फुंडकर यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. ते एक संवेदनशिल द्रष्टे नेते होते. अलीकडच्या काळात सरकारच्या विरोधात आम्ही आक्रमक भूमिका घेत असतानाही त्यांनी कधीही हटकले नाही. ते मुळात शेतकरी असल्यामुळे त्यांना शेतीप्रश्नाची जाण होती.  - रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी पक्ष, महाराष्ट्र राज्य कृषिमंत्री यांच्या निधनाने विद्यापीठ परिवार दुःखात बुडाला, त्यांचे या विद्यापीठाकडे घरासारखे लक्ष होते. विद्यापीठाच्या प्रगतीसाठी मनापासून प्रयत्न त्यांनी सुरू केले होते. विदर्भ विकासासाठी त्यांच्या मनात तळमळ होती. शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीचा त्यांच्या मनात विचार होता. बोंड अळी, जलसंधारण, उत्पन्न दुप्पट वाढविण्यासाठी ते सातत्याने विचारविमर्श करीत. तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी त्यांनी याच वर्षी खामगावमध्ये पहिला कृषी महोत्सव भव्य स्वरूपात त्यांनी घेतला. प्रकृती साथ देत नसताना सुद्धा ते शेतकरी विकासासाठी झटत होते. - डाॅ. व्ही. एम. भाले, कुलगुरू, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com