परभणीची सुधारित हंगामी पैसेवारी ४४.९५ पैसे

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी : परभणी जिल्ह्यातील सर्व ८४९ गावांतील खरीप पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्याची सुधारित हंगामी पैसवारी सरासरी ४४.९५ पैसे आली आहे, तर हिंगोली जिल्ह्यातील सर्व ७०७ गावांतील सुधारित हंगामी पैसेवारी ६८.०५ पैसे आली आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

परभणी जिल्ह्यामध्ये एकूण ८५३ गावे आहेत. बलसा (ता. परभणी) या गावाचे कृषी क्षेत्र विद्यापीठासाठी, तर करजखेडा (ता. सेलू), चौधरणी खुर्द, लिंबाळा (ता. जिंतूर) या गावांचे कृषी क्षेत्र धरणासाठी संपादित झाल्यामुळे एकूण ८४९ गावे पैसेवारीसाठी पात्र आहेत.

साईनगर या नवीन गावाचा समावेश करण्यात आल्यामुळे जिंतूर तालुक्यातील एकूण गावांची संख्या १७१ झाली आहे. यंदा पैसेवारी जाहीर केलेल्या जिल्ह्यातील एकूण गावांची संख्या ८४९ झाली आहे. गेल्या दोन वर्षांपेक्षा ती एकने वाढली आहे.

जिल्हा प्रशासनाने ३० सप्टेंबर रोजी यंदाच्या खरीप हंगामातील नजरी हंगामी पैसेवारी जाहीर केली होती. जिल्ह्यातील पाथरी, गंगाखेड, पालम या तीन तालुक्यांतील २१९ गावांची हंगामी (नजरी) पैसेवारी ५० पेक्षा कमी, तर  ६३० गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त, तर जिल्ह्याची सरासरी हंगामी पैसेवारी ५१.९४ पैसे आली होती. जिल्ह्यामध्ये एकूण लागवडीयोग्य क्षेत्र ५ लाख ८३ हजार ३७८ हेक्टर आहे.

यंदाच्या खरीप हंगामात ५ लाख ५१ हजार २४ हेक्टवर पेरणी झाली. ३२ हजार ४४३.९५ हेक्टर क्षेत्र नापेर (पडीक) राहिले होते. मंगळवार (ता. ३१) पर्यंत जिल्ह्यात सरासरी ५४६ मिलिमीटर म्हणजेच वार्षिक सरासरीच्या ७०.३ टक्के पाऊस झाला. जिल्ह्यातील मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी, बाजरी पिकांच्या उत्पादनात मोठी घट आल्याचे पीक कापणी प्रयोगावरून स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील पैसेवारीसाठी पात्र असलेल्या सर्व ८४९ गावांतील खरीप पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे मंगळवारी (ता. ३१) जाहीर करण्यात आले.

जिल्ह्याची सरासरी सुधारित हंगामी पैसेवारी ४४.९५ पैसे आली आहे. यामुळे शासन जिल्ह्यात दुष्काळग्रस्तांच्या सवलती जाहीर करू शकते; परंतु त्यासाठी अंतिम पैसेवारीची जाहीर होईपर्यंत थांबावे लागणार आहे.

हिंगोलीची पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक हिंगोली जिल्ह्यातील सर्व पाच तालुक्यांतील ७०७ गावांची यंदाच्या खरीप पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी ६८.०५ पैसे आली आहे. हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ३ लाख ८४ हजार ५०७.७ हेक्टरवर पेरणी झाली होती. १६ हजार ६९२.९१ हेक्टर जमीन नापेर राहिली होती. यंदा ६३९.४ मिलिमीटर (७२.२ टक्के) पाऊस झाला. आधी पावसाच्या खंडामुळे नंतर काढणीच्या वेळी आलेल्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले होते.

जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (ता. ३१) खरिपाची सुधारित हंगामी पैसेवारी जाहीर केली. हिंगोली तालुक्याची पैसेवारी (१५२ गावे) ७०.१४ पैसे, कळमनुरी तालुका (१४८ गावे) ७०.०९ पैसे, वसमत तालुका (१५२ गावे) ७२.९६ पैसे, औंढा नागनाथ तालुका (१२ गावे) ५८ पैसे, सेनगांव तालुका (१३३ गावे) ६९.१० पैसे आली असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com