खरिपातून विक्रमी धान्योत्पादनाची यंदा शक्‍यता कमी

यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे. हा पाऊस खरीप पिकांसाठी पोषक आहे. मात्र, ईशान्य भारतातील भातपीक, महाराष्ट्रातील कापूस आणि सोयाबीन पिकांविषयी चिंता निर्माण झाली आहे. आसामधील पुराने २ लाख ४४ हजार हेक्‍टरवरील भातपिकाचे नुकसान झाले आहे. - एन. चट्टोपाध्याय, कृषी विभागप्रमुख, भारतीय हवामान विभाग
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली ः देशातील दक्षिण भागात अपुरा पाऊस; तर ईशान्य आणि उत्तर भारतातील काही भागांत मुसळधार पावसाने आलेल्या महापुरामुळे खरीप पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे यंदाच्या खरीप हंगामातून गेल्या वर्षीएवढे विक्रमी धान्योत्पादन मिळणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
 
गेल्या वर्षी खरीप हंगामात १३८.५२ दशलक्ष टन एवढे विक्रमी धान्योत्पादन झाले होते. दरम्यान, यंदाच्या खरिपात गेल्या वर्षीएवढेच विक्रमी धान्योत्पादन होईल, असा अंदाज यापूर्वी कृषी खात्याचे सचिव शोभना पटनायक यांनी व्यक्त केला होता.
 
मात्र, खरीप पिकांची सद्यःस्थिती लक्षात घेता यंदाच्या खरिपातून विक्रमी धान्योत्पादन मिळण्याची शक्‍यता कमी आहे, असा अंदाज कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
 
कृषी मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील कडधान्ये पीकक्षेत्र ३.६ टक्‍क्‍यांनी, तेलबिया क्षेत्र ८.८ टक्‍क्‍यांनी, भात पीकक्षेत्र १.४ टक्‍क्‍याने आणि भरडधान्ये पीकक्षेत्र २.१ टक्‍क्‍यांनी कमी झाले असल्याचे दिसून आले आहे.  तसेच आसाम, बिहार, गुजरात, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि पश्‍चिम बंगालमधील ३.६७ दशलक्ष हेक्‍टरवरील पिकांना पुराचा फटका बसला आहे. 
 
याबाबत भारतीय हवामान विभागातील कृषी विभागाचे प्रमुख एन. चट्टोपाध्याय यांनी म्हटले आहे, की यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे. हा पाऊस खरीप पिकांसाठी पोषक आहे. मात्र, ईशान्य भारतातील भातपीक, महाराष्ट्रातील कापूस आणि सोयाबीन पिकांविषयी चिंता निर्माण झाली आहे.
 
आसामधील पुराने २ लाख ४४ हजार हेक्‍टरवरील भातपिकाचे नुकसान झाले आहे. ईशान्य भारतातील ज्या भागांत भातपिकांचे नुकसान झाले आहे; तेथील शेतकऱ्यांना भरडधान्ये पिके घेण्याचा सल्ला देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
 
तसेच दक्षिण भारतातील तमिळनाडू, कर्नाटकात ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे तेथील पिकांना त्याचा फटका बसला आहे. कर्नाटकसह, महाराष्ट्र, तमिळनाडू आणि तेलंगणमध्ये मका पिकाला कमी पावसाचा अधिक फटका बसला असल्याचे दिसून आले आहे
 
मका लागवड क्षेत्रात घट
देशातील विविध भागांत आतापर्यंत ७.९ दशलक्ष हेक्‍टवर मका लागवड झाली आहे. हे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ४ टक्‍क्‍यांनी कमी आहे. यामुळे उत्पादन एक दशलक्ष टनांनी कमी होण्याचा अंदाज आहे.
 
कर्नाटकमध्ये पावसाचे प्रमाण सरासरी सात टक्‍क्‍यांनी कमी राहिले आहे. यामुळे कर्नाटकातील मका उत्पादन ५ लाख टनांपर्यंत खाली येण्याची शक्‍यता आहे. गेल्या वर्षी सुमारे साडेसहा लाख टन मका उत्पादन झाले होते, अशी माहिती कर्नाटक राज्य मका संघटनेचे सरचिटणीस के. जावेद यांनी सांगितले.
 
कर्नाटकातील ऊस उत्पादन घटणार
कर्नाटकातील ऊस उत्पादन घटण्याची चिन्हे दिसत आहेत. राजस्थानमध्ये हल्लीच्या काही दिवसांत मुसळधार पावसामुळे मूग, बाजरी पिकांचे नुकसान झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com