धनादेश न वटलेल्या शेतकऱ्यांचे १५ डिसेंबरपर्यंत पैसे द्या

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नाशिक : बॅंकेत धनादेश न वटलेल्या कांदा उत्पादकांचे पैसे येत्या १५ डिसेंबरअखेरपर्यंत अदा करावेत, अन्यथा कडक कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा देत जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी ज्या दिवशी कांदा विकला त्याच दिवसाचा धनादेश उत्पादक शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश व्यापाऱ्यांना दिले आहे.

विकलेल्या कांद्याचे धनादेश बॅंकेत न वटल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यानी संबंधित व्यापाऱ्यांकडे तक्रार केली असता टाळाटाळ केली. त्यामुळे या शेतकऱ्यांनी तक्रारी मांडल्याने या संदर्भात पणनमंत्री सुभाष देशमुखांचे लक्ष वेधण्यात आले असता जिल्हा उपनिबंधक करे यांना या संदर्भात कारवाई करण्याचे निर्देश मंत्रालयातून देण्यात आले होते.

या अनुषंगाने उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीत करे यांनी शुक्रवारी (ता. १) बैठक घेत धनादेश न वटलेल्या कांदा उत्पादकांचे पैसे १५ डिसेंबरअखेर पर्यंत अदा करण्याचे स्पष्ट आदेश संबंधित व्यापाऱ्यांना दिले. या मुदतीत रक्कम अदा न झाल्यास कडक कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

तसेच ज्या दिवशी कांदा विकला आहे, त्याच दिवसाचा धनादेश उत्पादकांना देण्याची सूचना व्यापाऱ्यांना उपनिबंधक करे यांनी केली. बैठकीस कृउबा चेअरमन राजेंद्र देवरे, सचिव नितीन जाधव, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष खंडू पंडित देवरे, संचालक विलास देवरे, बाळासाहेब देवरे, धर्मा देवरे, गोरख कचवे, गणेश देवरे, रामदास साळुंके आदींसह कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

बाजार समितीचे सचिव नितीन जाधव यांनी बैठकीत ठरल्यानुसार कांदा व्यापारी संघटनेस पत्र देऊन शासन निर्देशाप्रमाणे काम करण्याची सूचना केली असून, कांदा ज्या दिवशी विकत घेतला जाईल त्याच दिवसाचा धनादेश उत्पादकांना देण्याची सूचना केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com