‘त्या’ चारा छावणीची मान्यता रद्द

‘त्या’ चारा छावणीची मान्यता रद्द
‘त्या’ चारा छावणीची मान्यता रद्द

बीड : शेतकऱ्यांचा खोटा पुळका दाखवत सुरवातीला जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करा, अशा आरोळ्या ठोकणाऱ्या काही छावणीचालकांनी जनावरांचे खोटे आकडे टाकून आणि चाऱ्याला काट मारून सुरवातीला खाबूगिरी केली. ही खाबूगिरी पचल्यानंतर आता थेट दंडाधिकारीय अधिकार असलेल्या अधिकाऱ्यांसोबत दादागिरी करण्यापर्यंत या मंडळींची मजल गेली आहे. कोल्हारवाडी (ता. बीड) येथील मत्स्यगंधा संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या चारा छावणीची मान्यता रद्द करून जिल्हाधिकाऱ्यांनी छावणीचालकांच्या खाबूगिरीला लगाम घातला आहे. मात्र दादागिरीचे काय, असा प्रश्न आहे. गुरुवारी (ता. नऊ) कोल्हारवाडी (ता. बीड) येथील चारा छावणी तपासणीसाठी गेलेल्या उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांना रोखण्याचे धाडस आणि अडथळा आणण्यासाठी थेट विद्युत खंडित करण्याच्या प्रकाराने प्रशासनासमोरही मोठे आव्हान निर्माण झाले आहे. 

सामान्यांनी एखाद्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घातली, तरी त्याच्यावर शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा नोंद होतो. या ठिकाणी तर दंडाधिकारीय अधिकार असलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांना रोखण्यापर्यंत मजल मारली गेली. एवढेच नाही, तर तपासणीसाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि पोलिस फौजफाटा तैनात करण्याची वेळ आली, तरीही प्रशासन यावर ठोस कारवाई का करत नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. विशेष म्हणजे, छावणीचालक संघटनेनेही अशा प्रकारांना पाठीशी घातले जाणार नसून, बोगसगिरी आणि दादागिरीवर कारवाईची मागणी केली आहे. सुरुवातीला शासनाने दावणीला चारा देण्याचा मानस व्यक्त करताच शेतकऱ्यांचे तथाकथित तारणहार पुढे आले आणि छावण्यांतूनच चारा देण्याची मागणी करू लागले. शेतकऱ्यांच्या जनावरांपेक्षा दुष्काळातून मलिदा खाण्यासाठीच ही तळमळ होती हे आता लपून नाही. सध्या जिल्ह्यात आठशेंवर चारा छावण्यांना मंजुरी असून, सहाशेंवर चारा छावण्यांत चार लाखांवर जनावरे आहेत. मात्र, यातील खरे जनावरे किती आणि कागदी किती, हा संशोधनाचा विषय आहे.  दरम्यान, छावण्यांत चारा देण्याच्या निकषालाही फाटा देण्यात येत आहे. याबाबतच्या तक्रारीवरून खुद्द जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी चारा छावण्यांना दिलेल्या भेटीतही हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यामुळे गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पाच उपविभागीय अधिकाऱ्यांना बीड आणि आष्टी तालुक्यातील चारा छावण्यांच्या तपासणीचे आदेश देण्यात आले.  उपविभागीय अधिकारी शोभा जाधव कोल्हारवाडीच्या चारा छावणीत पोचल्यानंतर त्यांना तपासणीपासून तब्बल तासभर रोखले. छावणी तपासणी होऊन काळंबेरं उघड होऊ नये म्हणून विद्युत पुरवठाही खंडित करण्यात आला. छावणीचालकाच्या या मुजोरीनंतर पोलिस बंदोबस्त बोलावून छावणीची तपासणी झाली. तसेच, विद्युत पुरवठा खंडित असल्याने अधिकाऱ्यांना बॅटरीच्या प्रकाशात तपासणी करावी लागली. प्रशासनाने पोलिस बंदोबस्त आणि बॅटरीचा प्रकाश वापरला असला, तरी या मुजोरीचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. चारा छावणीतील जनावरांतील तफावतीमुळे या छावणीची मान्यता शुक्रवारी रद्द करण्यात आली. आता प्रशासन या मंडळींची दादागिरी कशी रोखते, याकडे लक्ष लागले आहे. बोगसगिरी, दादागिरीचे समर्थन नाही शेतकऱ्यांच्या जनावरांना नियमानुसार चारा व पाणी भेटले पाहिजे. आमच्याही मागण्या मान्य झाल्या पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे. तपासणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सहकार्य व्हावे. बोगसगिरी आणि दादागिरीचे छावणीचालक संघटना समर्थन करणार नाही, अशी भूमिका अध्यक्ष अशोक हिंगे यांनी मांडली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com